ब्राह्मणेतर’ चळवळ म्हणजे प्रागतिक शक्यतांचा महाराष्ट्र घडविणारी, व्यापक राजकीय समज निर्माण करणारी महत्त्वाची चळवळ होती. आता तसाच नव्या ‘मराठेतर’ चळवळीचा पाया घातला जात आहे, हे स्पष्ट दिसत आहे. आता हा ‘मराठेतर’ मार्ग प्रागतिक दिशेनं जाईल असं कोणाला वाटत असेल, तर त्या बहुजन जातींच्या हितैषींना जोरदार शुभेच्छा ! – प्रथमेश पाटील (पत्रकार Indie Journal) •••••••••••••••••••••••••••••••••
यावर मी दिलेला प्रतिसाद असा :
ब्राह्मणेतर, सत्यशोधक व सत्यशोधक ब्राह्मणेतर असे तिलाही तीन पदर होते. १९३०ला ती कॉंग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीत विलीन झाली. शेतकरी कामगार पक्ष तीची उपज मानला तरी तो मिरासदार शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष होता. ब्राह्मणांवरील रागाचे जसे अनेक आयाम आहेत तसेच मराठा या प्रभुत्वशाली जातीशी इतरांचा राग लोभाचा संबंध आहे. जनरलायझेशन करणार नाही लगेचच पण, खेड्यात मी जो मराठा व मराठेतर संबंध पाहिला ती निरीक्षणे अशी : एकतर ब्राह्मण व गावातील बनिया व पाटील अशी गावावर हुकमत ठेवणारी युती होती. सगळ्या गावाचाच गावकुसाबाहेरच्यांशी व्यवहार कमी अधिक पण तुच्छतेचाच होता. मराठ्यांना, ब्राह्मण, बनिया (वाणी) व सोनार, शिंपी, साळी या जातीचे लोक उपहासाने ‘छत्रपती’ म्हणायचे खासगीत. म्हणजे सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा एकत्र आल्यावर मराठ्यांना निर्बुद्ध संबोधण्याचा आनंद घेत. या जातींना जोडून सुतार, न्हावी, परीट, गुरव, तांबोळी सुद्धा संख्यादुर्बल असल्याने गावातील संख्याबहुल मराठ्यांना वचकून असत. माळी (धनगर, वंजारी आमच्याकडे क्वचितच) ही दुसरी संख्याबहुल जात मराठ्यांची सर्वच बाबतीत स्पर्धक. मराठ्यांवर कारागिर जातींचा राग असण्याचे कारण मराठ्यांची अरेरावी. कोळी, लोहार, चांभार, कुंभार हेही याच कारणाने मराठ्यांवर नाराज असत. आता या सर्व गावकुसाच्या आतील संख्यादुर्बल जातींना ‘हिंदू’ या ओळखीत आपली सुरक्षा (संख्यात्मकही) पाहणे सोयीचे होते. संघ आणि जनसंघाने ही बाब हेरली होती. या जाती आवाज न करता संघ परिवाराकडे सरकल्या होत्या. मराठ्यांसाठी अलिकडे ‘सरंजामी’ ही शिवी देऊन मराठेतर अघोषितपणे एकवटताहेत, असे दिसते. पुरुषप्रधानतेत बेतालपणे पुरुषसत्ता उपभोगलेल्या व सराईतपणे स्त्रियांना दुय्यम लेखणाऱ्या पुरुषांचा जसा आता बदललेल्या उत्पादन संबंधात स्वभान आलेल्या स्वावलंबी स्त्रियांच्या बाबतीत गोंधळ उडालेला आहे, तोच प्रकार मराठ्यांचाही झाला आहे. आतून पोकळ होत गेल्यावर त्या पराभूततेवर मात करण्यासाठी जो उसना अहंकार पृष्ठभागी येतो तो चिंताजनकच असतो.