• 99
  • 1 minute read

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जातींच्या उत्पत्तीचा सिद्धांत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जातींच्या उत्पत्तीचा सिद्धांत

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-२० (२४ जुन २०२४)
(डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जातींच्या उत्पत्तीचा सिद्धांत, कालच्या भाग क्र. १९ वरुन पुढे.. क्रमशः)

इतर संशोधकांनी मांडलेल्या जातींच्या सिद्धांतांच्या सर्व व्याख्येंचे परीक्षण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “यापैकी कोणतीही व्याख्या स्वयंपूर्ण किंवा बरोबर नाही”. प्रत्येक जात ही जातींच्या साखळीतील एक दुआ असतो. सर्व जातीत आढळणाऱ्या समान मुद्यांचेच विवेचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. कारण, हे समान गुणधर्मच जातींची वैशिष्ठे म्हणून इतर संशोधकांनी दाखविले आहेत.

१. सेनार्ट यांनी विटाळाच्या कल्पनेला जातीचे वैशिष्ठ मानले आहे. परंतु, बाबासाहेबांच्या मते, ‘जातीच्या घडणीत विटाळाची कल्पना हे खास वैशिष्ठ नाही, हे सहज स्पष्ट होण्यासारखे आहे. साधारणतः ही कल्पना ब्राह्मण कर्मकांडातून निर्माण झाली आणि शुद्ध व अशुद्धतेच्या सर्वमान्य कल्पनेचे ते एक विशिष्ट रूप आहे. त्यामुळे, विटाळातून जातीची उत्पत्ती झाली असे मानता येत नाही.

२. नेसफील्डच्या व्याखेचे परिक्षण करतांना बाबासाहेब म्हणतात की, ‘त्यांनी जातीबाह्य भोजणाच्या बंदीवर एक विशिष्ट म्हणून विशेष भर दिला आहे. जात ही एक स्वयंमर्यादित संस्था असल्यामुळे स्वभावत:च तिच्या संभासदांवर भोजन आदी सामाजिक व्यवहार जातींच्या अंतर्गतच करण्याची मर्यादा पडते. जातीबाह्य भोजनबंदी ही मुद्दाम लादलेली नसून जातीच्या स्वभाव धर्मचाच तो एक परिणाम आहे. पुढे तिला धार्मिक आज्ञेचे रूप प्राप्त झाले असावे. म्हणूनच, भोजनबंदी हे देखील जातींच्या उत्पत्तीचे कारण नाही, तर तो एक परिणाम आहे’.

३. सर एच. रिज्ले यांच्या व्याख्येत नवीन असे काहीच नाही, असे बाबासाहेब मानतात.

४. डॉ. एस. व्ही. केतकरांच्या व्याख्येसंबंधी बाबासाहेब म्हणतात की, ‘डॉ. केतकरांनी जातीचा खऱ्या विवेचक बुद्धीने आणि खुल्या अंत:करणाने विचार केला आहे. त्यांची व्याख्या निश्चितच विचारात घेण्याजोगी आहे. कारण, त्यांनी संपूर्ण जातीव्यवस्थेच्या संदर्भात जातीची व्याख्या केली असून, जातीच्या अस्तित्वासाठी अत्यंत अनिवार्य अशा वैशिष्ट्यांवरच लक्ष केंद्रित केले आहे’. बाबासाहेब पुढे म्हणतात की, ‘डॉ. केतकरांची व्याख्या तशी ठीक आहे. परंतु, बऱ्याच बाबतीत ती अस्पष्ट आहे. जातीबाह्य विवाहबंदी आणि जातीत जन्मलेल्यांनाच सदस्यत्व असे त्यांनी दोन मुद्दे मांडले आहेत’. पण, बाबासाहेबांच्या मते, ‘या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर, जातीबाह्य विवाहाला बंदी असेल तर, स्वाभाविकत:च सदस्यताही आपल्या समुदायापर्यंत सीमित राहील. त्यामुळे, यात मौलिक भिन्नता नाही.

वरील सर्व व्याख्येंचे अध्ययन केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे प्रतिपादन करतात की, “एकाच जातीमध्ये विवाह करण्याची व्यवस्था अर्थातच जातीअंतर्गत विवाह हे जातींच्या उत्पत्तीचे मुख्य कारण आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत पुढील भागात..)

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *