• 12
  • 1 minute read

आकड्यांचा आभास : IIM उदयपूरचा प्रवेशाचा अभ्यास जातीन्यायाबद्दल चुकीचं चित्र दाखवतो

आकड्यांचा आभास : IIM उदयपूरचा प्रवेशाचा अभ्यास जातीन्यायाबद्दल चुकीचं चित्र दाखवतो

आकड्यांचा आभास : IIM उदयपूरचा प्रवेशाचा अभ्यास जातीन्यायाबद्दल चुकीचं चित्र दाखवतो

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) उदयपूर येथील काही प्राध्यापकांनी नुकताच एक खूप चर्चित असलेला अभ्यास केला आहे. त्यांनी भारतातील उच्च शिक्षणावर होणाऱ्या सर्वेक्षणातील (AISHE) आकडे वापरले आहेत, ज्यात देशभरातील सुमारे ६०,००० हून अधिक महाविद्यालये-विद्यापीठे आणि ४.३८ कोटी विद्यार्थी यांचा समावेश आहे.
 
या अभ्यासातून ते असा दावा करतात की अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्ग (OBC) या गटातील विद्यार्थी आता भारताच्या उच्च शिक्षणात “प्रबळ” झाले आहेत आणि सर्वसाधारण (General) गटातील विद्यार्थ्यांपेक्षा त्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यांच्या मते, २०१०–११ मध्ये एकूण प्रवेशातील SC/ST/OBC विद्यार्थ्यांचा वाटा ४३% होता, तो २०२२–२३ मध्ये वाढून ६०.८% झाला आहे.
 
पहिल्या नजरेला हे पाहताना असं वाटतं की हा खूप मोठा बदल आहे – जणू ऐतिहासिकदृष्ट्या वंचित राहिलेल्या SC/ST/OBC समाजाला आता खऱ्या अर्थाने महाविद्यालये आणि विद्यापीठांत जागा मिळू लागली आहे. पण हा कथित “यशाचा” गोफ नीट पाहिला, तर त्यात बऱ्याच ठिकाणी भेगा दिसतात. या अभ्यासाचे निष्कर्ष देशभरातील सगळी महाविद्यालये आणि विद्यापीठे एकाच भांड्यात टाकून केलेल्या साध्या बेरजे वर आधारलेले आहेत. त्यांच्या मते महाविद्यालये आणि विद्यापीठांत फक्त विद्यार्थ्यांच्या संख्ये नुसार, जातीन्याय होत आहे असे मानता येते.
 
फक्त संख्या जास्त आहे म्हणून SC, ST आणि OBC विद्यार्थी आता उच्च शिक्षणात “वर्चस्वात” आहेत असे म्हणणे, म्हणजे थोडक्यात असे आहे : काही मोजकी पंच तारांकित हॉटेलं आणि हजारो रस्त्याकडेला असलेल्या टपऱ्या एक समान धरून, “पाहा, गरीब लोक सुद्धा आता बाहेर हॉटेलिंग करण्यात अग्रेसर आहेत, कारण जास्तीत जास्त ग्राहक हे रस्त्यालगतच्या धाब्यावर, टपऱ्या वर खाणारे सामान्य गरीब आहेत” असे घोषित करण्यासारखे आहे. असा निकष वापरला की महत्त्वाचे प्रश्न बाजूला राहतात – हॉटेलचा खरा मालक कोण? नफा कोणाच्या खिशात जातो? पुरवठ्याच्या साखळीवर नियंत्रण कोणाचे? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांसाठी असलेल्या ठिकाणी कोण लोक ये-जा करतात?
 
अगदी तसेच, IIM उदयपूरचा हा अभ्यास एखाद्या दुर्गम जिल्ह्यातील साध्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजला – जे अनेकदा कमी अनुदानित असते, लॅब, संशोधन सुविधा, प्लेसमेंट सपोर्ट नसतो – आणि दुसरीकडे IIT सारख्या सर्वोच्च संस्थांना किंवा महानगरातील नामांकित खाजगी विद्यापीठांना, जणू एका ओळीत उभे करतो. अशा साध्या कॉलेजमधील एक साधा B.A. पदवीचा कोर्स क्वचितच मोठ्या, उच्च वेतनाच्या नोकऱ्यांची दारं उघडतो; उलट गर्दीच्या नोकरी बाजारात अस्थिर बेरोजगारीकडेच अनेकांना ढकलतो. पण IIT मधील B.Tech ही पदवी मात्र थेट देशातील कॉर्पोरेट उच्चवर्ग, तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि प्रशासकीय नेतृत्वाकडे जाणारा महामार्ग बनते.
 
वेगवेगळ्या शैक्षणिक कॉलेजेस, संस्था, विद्यापीठ यांच्यात असलेल्या या सगळ्या प्रतिष्ठा आणि दर्जाच्या पायऱ्या सपाट करून टाकल्यामुळे, आय आय एम उदयपूर चा अहवाल फक्त “संख्या वाढली = प्रगती झाली” असा सोपा निष्कर्ष काढतो. आणि त्यामुळे “सामाजिक न्याय साध्य झाला” अशी गोड गोष्ट सांगितली सांगतो, पण व्यवस्थेतली खरी सत्ता कोणाच्या हातात आहे, हा मूलभूत प्रश्न मात्र बाजूला सारला जातो.
 
हा अहवाल आणखी एक खोल स्तरावरची चूक करतो ती म्हणजे तो SC, ST आणि OBC आणि जनरल कॅटेगरी यांच्या लोकसंख्येच्या वास्तवाकडे दुर्लक्ष करतो. SC, ST आणि OBC मिळून भारताच्या लोकसंख्येचा मोठा म्हणजे 76% बहुमत आहेत, तर वरच्या (सवर्ण) जातींचा टक्का खूप कमी म्हणजे केवळ 24% आहे ज्यामध्ये 10% धार्मिक अल्पसंख्यांक सुद्धा आहेत. किमान थोडाफार न्याय्य असलेल्या कोणत्याही व्यवस्थेत, SC/ST/OBC या मोठ्या समाजघटकांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असणं स्वाभाविकच आहे. मुद्दा हा नाही की त्यांची संख्या जास्त आहे की नाही; खरा प्रश्न असा आहे – त्यांच्या संख्येचा वाटा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाशी जुळतो का? आणि त्यांना खरोखर दर्जेदार, प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, कॉलेजेस आणि विद्यापीठात आणि महत्त्वाच्या अभ्यासक्रमांमध्ये समान आणि न्याय्य संधी मिळते का?
 
जेव्हा आपण हे आकडे लोकसंख्येच्या अंदाजांशी तुलना करून पाहतो – साधारण ५२% OBC, १६% SC, ८% ST आणि २४% General (ज्यात EWS आणि इतर धार्मिक घटकही आले) – तेव्हा खूप मोठ्या उणिवा स्पष्ट दिसतात. २०२२–२३ च्या AISHE च्या आकड्यानुसार, OBC विद्यार्थ्यांचे प्रवेश अपेक्षेपेक्षा सुमारे २५% कमी आहेत (हवे होते अंदाजे २.२८ कोटी, झाले फक्त १.७० कोटी). SC साठी ही तफावत सुमारे ३% आहे (७०.१ लाख हवे होते, झाले ६७.९ लाख) आणि ST साठी तर सुमारे १९% आहे (३५ लाख अपेक्षित, झाले फक्त २८.२ लाख). उलट, General गटाला मात्र ६३% “जादा” प्रवेश लाभले आहेत (१.०५ कोटी अपेक्षित, प्रत्यक्षात १.७२ कोटी). म्हणजेच एकूण प्रवेशात SC/ST/OBC मिळून ६०.८% वाटा असला, तरी त्यांच्या लोकसंख्येच्या साधारण ७६% वाट्याच्या खूप खालीच ते आहेत. हे जे “वर्चस्व” दाखवलं जातंय, ते फक्त संख्या खेळ आहे; लोकसंख्येच्या प्रत्यक्ष प्रमाणाशी तुलना जाणीवपूर्वक टाळल्यामुळे तयार झालेला आभास आहे.
 
उच्च शिक्षणात जातीनुसार काय चाललं आहे याचं खरं चित्र समजून घ्यायचं असेल, तर सगळ्या संस्थांना एकाच रांगेत न उभं करता त्यांच्या पायऱ्या वेगळ्या करून पाहाव्या लागतात. या पिरॅमिडच्या टोकावर असतात “Institutes of National Importance” आणि काही अग्रगण्य सार्वजनिक विद्यापीठं – जसे IITs, IIMs, AIIMS, NITs, NLUs, IISERs आणि काही प्रमुख केंद्र व राज्य विद्यापीठं. ह्याच संस्थांतून देशाच्या उच्च नोकरशाहीत, कॉर्पोरेट उच्चवर्गात आणि मोठ्या संशोधन प्रकल्पांत जाणारा “टॅलेंट” तयार होतो.
 
त्याच्या थोडं खाली मोठी फी घेणारी, महानगरांमधली नामांकित खाजगी विद्यापीठं असतात. ही विद्यापीठं परदेशी विद्यापीठांशी भागीदारी, कॅम्पस प्लेसमेंटमध्ये वर्चस्व वगैरेमुळे खूप प्रभावशाली असतात, आणि अनेकदा आरक्षणाच्या नियमांना बगल देतात. त्याखाली मध्यम दर्जाची प्रोफेशनल कॉलेजेस – मेडिकल, इंजिनियरिंग, मॅनेजमेंट, लॉ इत्यादी – ज्यांचा दर्जा खूप असमान असतो. सगळ्यात तळाशी म्हणजे ग्रामीण आणि छोट्या शहरांमधील सामान्य आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेजेस – ज्यांच्याकडे पुरेशा सुविधा, फॅकल्टी, प्रयोगशाळा, संशोधन आणि करिअर सपोर्ट यांचा मोठा अभाव असतो.
 
IIM उदयपूरचा अहवाल मात्र या सगळ्या पायऱ्यांना जवळजवळ पूर्णपणे दुर्लक्षित करतो. कोणत्या स्तराच्या संस्थांमध्ये कोण आहेत, कोणत्या अभ्यासक्रमांना किती महत्व आणि करिअरची सुरक्षा मिळते आहे, याचा कुठलाही तपशीलवार वेगळा डेटा तो देत नाही. पण जेव्हा आपण संसदेच्या शिक्षण विषयक स्थायी समितीचा ताजा अहवाल (AISHE २०२२–२३च्या आकड्यांवर आधारित) पाहतो, तेव्हा अगदी वेगळं आणि धक्कादायक चित्र समोर येतं.
 
भारतातील टॉप ३० खाजगी विद्यापीठांमध्ये SC विद्यार्थ्यांचा वाटा फक्त ५%, ST चा १% पेक्षाही कमी आणि OBC चा साधारण २४% इतका आहे – आणि हे सगळे मिळून आहेत ते लोकसंख्येतल्या साधारण ७६% च्या तुलनेत! BITS पिलानीसारख्या संस्थांनी जुन्या आकडेवारीत SC/ST/OBC विद्यार्थी शून्य दाखवले होते; अलीकडच्या आकड्यांत SC आणि ST मिळून १% च्याही खाली, आणि OBC फक्त १०% आहेत. O.P. Jindal Global University मध्ये SC आणि ST मिळून १% च्याही आत, आणि OBC साधारण ८% आहेत; शिव नादर युनिव्हर्सिटीमध्ये चित्र थोडं बरं असलं तरी SC फक्त १.४%, ST ०.८६% आणि OBC फक्त १६% आहेत.
 
ज्या संस्थांना “जागतिक संधींची दारं” मानलं जातं, त्या प्रत्यक्षात अजूनही सवर्ण जातींचे विशेषाधिकार आणि वर्चस्वाचे गड राहिले आहेत. या टॉप शैक्षणिक संस्थांमध्ये जातनिरपेक्षता आली आहे, किंवा तिथे जात कमी महत्त्वाची ठरत आहे, असा IIM उदयपूरचा अहवालाचा दावा, हे आकडे साफ खोटा पाडतात.
 
आश्चर्याची गोष्ट अशी की, संसदीय अहवालांचे दाखले इतर ठिकाणी वापरूनही हा अहवाल वर सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे सोयीस्करपणे दुर्लक्षित करतो. खाजगी क्षेत्रात SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांचा साधारण ६०% वाटा आहे, हे दाखवून तो “मेरिटवर आधारित मोठा बदल” झाल्याचा गाजावाजा करतो; पण खाजगी शिक्षण क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये जे वेगवेगळे स्तर आहेत त्याकडे तो डोळेझाक करतो. AISHE च्या आकड्यांवरून दिसतं की SC/ST/OBC विद्यार्थ्यांची वाढ मुख्यतः स्वस्त, कमी प्रतिष्ठेच्या सर्वसाधारण Arts आणि Commerce कोर्सेसमध्ये झाली आहे; उच्च दर्जाच्या खाजगी मेडिकल, इंजिनियरिंग, मॅनेजमेंट कोर्सेसमध्ये नाही. तिथे आजही SC आणि ST यांचा वाटा ८% च्या आत, आणि OBC चा २०% च्या आतच अडकलेला आहे.
 
याहून गंमत म्हणजे, या अहवालातील स्वतःचाच डेटा त्यांच्या मोठमोठ्या दाव्यांना छेद देतो. त्यांच्या अहवालातील डेटा सांगतो की “Professional आणि advanced courses” मध्ये जनरल कॅटेगरी विद्यार्थ्यांना जबरदस्त “जादा” प्रतिनिधित्व आहे – BE मध्ये ३९.५%, BTech मध्ये ५१.८%, ME/MTech मध्ये ३७%, MBA मध्ये ४८.८%, MBBS मध्ये ५५.३% आणि MD मध्ये तर ६०%. लोकसंख्येत त्यांचा साधारण २४% वाटा धरला, तर या क्षेत्रांत जनरल कॅटेगरी विद्यार्थ्यांना १.५ ते २.५ पट जास्तीच्या जागा मिळालेल्या आहेत– म्हणजेच देशाचे इंजिनिअर, डॉक्टर, मोठे मॅनेजर्स तयार करणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये सवर्ण जातींचे विशेषाधिकार आणि वर्चस्व अजून किती घट्ट बसले आहेत, हेच हे आकडे दाखवतात.
 
२०२०–२१ ते २०२२–२३ दरम्यान General category च्या प्रवेशात “घट” झाली, हा जो दावा आहे, तोही जवळून पाहिला तर टिकत नाही. २०१९–२० नंतर AISHE मध्ये १०% EWS आरक्षण स्वतंत्र कॉलम म्हणून दाखवायला सुरुवात झाली; आणि हे EWS तेच Unreserved (General) गटातून काढलं जातं. General आणि EWS असे दोन वेगळे भाग करून दाखवल्यामुळे General चा आकडा कृत्रिमरीत्या कमी दिसतो आणि सुमारे ११ लाखांची “घट” असल्याचा भास निर्माण होतो. प्रत्यक्षात ही कुठली जागा काढून घेण्याची प्रक्रिया नाही; हा फक्त हिशोब मांडण्याचा खेळ आहे. General आणि EWS पुन्हा एकत्र धरले तर त्यात स्थिरता, किंबहुना वाढच दिसते; घट नाही. खरी काटेकोर विश्लेषण हवं असेल, तर General+EWS ला एकत्र मालिका म्हणून ट्रॅक करून, नाव बदलल्याचा परिणाम आणि खऱ्या प्रवेश बदलाचा परिणाम वेगळा दाखवायला हवा; या अभ्यासात मात्र ते काही केलेलं नाही.
 
समता म्हणजे फक्त “किती जणांनी प्रवेश घेतला” इतकाच प्रश्न नाही; त्यात शिक्षणानंतरचे परिणाम आणि संस्थांमधली सत्ता हेदेखील येतात. IIM च्या या अभ्यासात “caste-to-class mobility” म्हणजेच जातीतून वर्ग बदलण्याबद्दल मोठमोठ्या कल्पना मांडल्या आहेत; पण त्यासाठी आवश्यक असलेले आकडे – जसे पदवी मिळाल्यानंतरची उत्पन्न पातळी, नोकऱ्यांचा दर्जा, करिअरमधला चढता आलेख – यांचा कोणताही पुरावा दिलेला नाही. ह्या सर्व शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक आणि प्राध्यापकांच्या पदावर SC/ST/OBC गटांची संख्या किती, त्यांचे प्रमाण किती, म्हणजे निर्णय घेणाऱ्या पदांवर SC/ST/OBC गटांचे प्रमाण किती, तसेच ड्रॉपआउट (मधेच शिक्षण सोडण्याचे) प्रमाण, संशोधनाच्या संधी – असे महत्त्वाचे निदर्शकही या अभ्यासात तपासले जात नाही. प्रश्न फक्त “ते प्रवेश घेत आहेत का?” एवढ्यावर थांबत नाही; खरा प्रश्न असा आहे – “ते त्या पदव्या मिळवत आहेत का ज्या प्रत्यक्ष सत्ता, पैसा आणि प्रतिष्ठेकडे दार उघडतात?”
 
हे सगळे दुर्लक्षित करूनही, या अभ्यासाचे लेखक धडाडीने आरक्षणधोरणचा “पुनर्विचार करण्याची” मागणी करतात आणि आपला अभ्यास धोरण बदलासाठी “प्रमाणाधारित आधार” देतो, असा दावा करतात. ही अतिशय धोकादायक मागणी आहे. SC/ST/OBC गटांचे शिक्षणातले कमी प्रतिनिधित्व, जनरल गटाचे उच्च दर्जाच्या संस्थांमधले जादा वर्चस्व, आणि जनरल गटाच्या प्रवेशात “घट” झाल्याचा खोटा दावा – हे सगळे तथ्य लक्षात घेतले, तर SC/ST/OBC आरक्षण कमी करण्याची मागणी करण्यासाठी काहीही आधार शिल्लक राहत नाही. उलट, हा डेटा जास्तीत जास्त एवढंच दाखवतो की SC/ST/OBC विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात हळूहळू थोडं तरी अधिक प्रवेश मिळू लागलाय; पण त्यांच्यासाठी आरक्षण “निरुपयोगी” झालंय, असे म्हणण्याइतका बदल अजिबात झालेला नाही – विशेषतः उच्च दर्जाच्या सरकारी आणि खाजगी संस्थांतील शिक्षणामध्ये.
 
प्रत्यक्षात संसदेच्या शिक्षण विषयक स्थायी समितीनेच या AISHE च्या डेटा वर आधारित अधिक प्रामाणिक निष्कर्ष काढला आहे. खाजगी उच्च शिक्षण संस्थांमधील SC/ST/OBC विद्यार्थ्यांची उपस्थिती “अत्यंत चिंताजनकपणे कमी” असल्याचे मान्य करून, या समितीने सरकारला खाजगी संस्थांमध्येही १५% SC, ७.५% ST आणि २७% OBC आरक्षण सक्तीचं करणारा नवीन कायदा करण्याची जोरदार शिफारस केली आहे. या आकड्यांमधून स्वाभाविकपणे असा निष्कर्ष निघतो. IIM उदयपूरचा “आरक्षणाचा पुनर्विचार” करण्याचा सल्ला मात्र या डेटातील तथ्यांच्या एकदम विरोधात आहे.
 
गल्लत होऊ देऊ नये – गेल्या कित्येक दशकांत सरकारी गुंतवणूक, आरक्षण, शिष्यवृत्ती आणि समाजचळवळींमुळे वंचित समाजघटकांचा उच्च शिक्षणात प्रवेश नक्कीच वाढला आहे; हे खरेच मोठे यश आहे. पण “प्रगती” आणि “पूर्ण समानता” हे दोन वेगळे टप्पे आहेत. त्यातली गल्लत करणे हे फक्त बौद्धिक चूक नाही; ते राजकीयदृष्ट्याही गंभीर आहे, कारण त्यामुळे खरी खोलवरची हस्तक्षेपाची गरज असताना “आता सगळं ठीक चाललंय” असा धोकादायक आत्मसंतोष निर्माण होऊ शकतो.
 
खरी समता हवी असेल, तर फक्त प्रवेश मोजून भागत नाही; प्रश्न असा विचारायला लागतो – शिकवतो कोण? नेतृत्वपदांवर बसतो कोण? वरच्या स्तरावर पोहोचवणाऱ्या पदव्या कोणाला सहज मिळतात? IIM च्या या अभ्यासात मांडलेला SC/ST/OBC यांच्या “वर्चस्व”चा सुर, प्रत्यक्षात सुरक्षात्मक उपाय कमी करण्याची भाषा करणाऱ्यांच्या हातात हत्यार बनू शकतो, ज्या वेळी संसदीय समितीचा अधिकृत अहवाल उलट खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण लागु करून ते आणखी मजबूत करण्याची मागणी करीत आहे.
 
सगळ्या प्रकारच्या संस्थांना एकत्र करून एकच सरासरी काढली, की कोण वरच्या मजल्यावर बसले आहे, हे दिसेनासं होतं – जसं पंचतारांकित हॉटेलं आणि रस्त्याकडच्या ढाबा एकत्र मोजले, तर खालच्या मजल्यावर जेवणाऱ्या गरिबांची संख्या दिसते; पण टॉवरच्या टॉपवर कोण जेवतं, हेच लपून जातं. वंचित समाजाचे लोक आज उच्च शिक्षणाच्या इमारतीत प्रवेशद्वारापर्यंत नक्की पोहोचले आहेत; पण अनेकांसाठी आतल्या खोल्यांची दारं अजूनही बंदच आहेत. जोपर्यंत अभ्यास आणि धोरण या कटू वास्तवाकडे प्रामाणिक नजरेने पाहत नाहीत, तोपर्यंत “जातीन्याय झाला, आता सगळं समान आहे” अशा घोषणा पोकळ आणि दिशाभूल करणाऱ्या ठरतील.
 
 
 
 
 
 
0Shares

Related post

संपत्तीचे केंद्रीकरण, उत्पनांच्या साधनांचे विकेंद्रीकरण न होणे ….. आणि व्हेलॉसिटी ऑफ मनी

संपत्तीचे केंद्रीकरण, उत्पनांच्या साधनांचे विकेंद्रीकरण न होणे: आणि व्हेलॉसिटी ऑफ मनी अर्थव्यवस्थेतील श्रीमंत / उच्च /…
मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ?

मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ?

मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ? गेल्या दहा वर्षात भारतीय…

मुंबईत मुलींचे अपहरण आणि राजकीय मौन : सोयीस्कर गप्पीची भयावह किंमत

मुंबईत मुलींचे अपहरण आणि राजकीय मौन : सोयीस्कर गप्पीची भयावह किंमत मुंबई देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी,…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *