समाजामध्ये हल्ली एक बदल अगदी बटबटीतपणे आढळून येतो. तो म्हणजे…
लोकांचा एकमेकांशी नैसर्गिक संवाद जवळजवळ बंद झाला आहे.
हल्ली घरांमध्ये होणारे छोटे समारंभ जवळजवळ बंद झाले आहेत.
मध्यम कार्यक्रम किंवा मोठे कार्यक्रम हॉलमध्ये साजरे होतात. त्याला इतकी माणसं निमंत्रित असतात की, यजमानाची तुमच्यावर एक नजर पडली तरी खूप झाले. मग जमलेली माणसं आपापला गट करूनचं स्थानापन्न होतात. सर्वजण तात्काळ स्क्रीनमग्न होतात. समारंभ कसला आहे? कोणकोण आलाय? काय चाललंय? यांच्याशी कसलाही संबंध नसल्यासारखी..!
नैसर्गिक संवाद …. नसतातचं.
अरे आहेस कुठे?
हल्ली काय नवीन आहे?
परदेशात गेला होतास ना?
तू किती बारीक झालीस..
ड्रेस काय मस्त आहे..
तुझी मुलगी काय क्यूट दिसते
मुलगा काय ICSE ला ना !?
असले औपचारिक संवाद घडतात. तेवढ्यात.. कुणाचा तरी मोबाईल वाजतो आणि हा संवादसुद्धा थांबतो. कुणी आपणहून कुणाशी बोलायला धजत नाही.
प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल असे वाटते की, “तो हल्ली स्वतःला खूप शहाणा समजतो.”
बरं,…
हे सगळे बाजूला सारून जर एखादा आपणहून सर्वांकडे जाऊन बोलू लागला तर इतरांना वाटतं, “हा हल्ली ज्याच्या त्याच्या गळ्यात का पडतो कुणास ठाऊक.”
हे सगळे अनुभवल्यावर असे वाटते की काय झालय् आपल्याला?
आपण हल्ली इतके तुसडे का वागतो?
त्याची कांही कारणे अशी असावित….
माणसांचे एकमेकांवरील अवलंबित्व संपत चालले आहे.
सक्तीची एकत्रित कुटुंब पद्धती,
पैशांचे पाठबळ, रात्री अपरात्री लागू शकणारी मदत, सुरक्षितपणा, धंदेवाईक असलात तर व्यवसायबंधूंचा आधार.
अशा अनेक गोष्टींमुळे पूर्वी माणसं एकमेकांशी जोडलेली राहत असत.
आता….
एकत्र कुटुंब मोडून छोटी छोटी कुटुंब झाली.
माणसांचे उत्पन्न वाढले त्यामुळे खर्च करण्याची शक्ती वाढली.
बँकांमधून सहजतेने कर्ज मिळू लागले.
एटीएम इत्यादींमुळे पैशाची आकस्मिक गरज भागुन जाते.
पैसा टाकला की मनुष्यबळ उभे करता येते.
घरात आजारी माणसाला सांभाळणाऱ्या माणसापासून मंगल कार्यातील कॅटररच्या फौजेपर्यंत सर्व काही उभे करता येते.
अपरात्री फोन करून रुग्णवाहिका येते तर मृत्युप्रसंगी सर्व कांही सांभाळणाऱ्या व्हॅन मागवता येतात.
ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे धंदेवाईक बंधुंची गरज संपत चालली आहे.
समाजाऐवजी गटसमूह तयार होतायत. त्यात राहूनही माणूस एकाकी पडतोय.
मानसिक – भावनिक आधार तुटत चाललाय.
अपयश, दु;ख, आजारपण अशा गोष्टींमुळे खचून, संपूर्ण कुटुंबचं जेव्हा आत्महत्त्या करते तेव्हा असे वाटते की झालय काय आपल्याला?
वरकरणी सर्वत्र भरभराट आणि ऐश्वर्य दिसत असतांना…
अति ताणामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग वेगाने वाढताहेत. माणसा – माणसांमधील सहज आणि नैसर्गिक संवादामुळे होणारे भावनांचे अभिसरण ( ventilation) खरेच थांबलंय.
जुनी मुरलेली मैत्री विसरून मित्र आपापल्या मोठेपणाच्या कोषात जाऊन बसतात.
लग्नप्रसंगी, शुभकार्यात पूर्वीची एकमेकांना मदत करण्याची पद्धत गेली. आता तर अगदी सख्खी भावंडंसुद्धा अडवणूक करतात. बोलणं बंद करतात, नाती तोडतात …. मग पुन्हा माणूस ‘एकला चालो रे’ कडे वळतो. तुसडेपणाचे एक नवीन आवर्तन सुरु होते.
तरीही हा प्रश्न अनुत्तरीतचं राहतो …काय झालय आपल्याला? …आपण हल्ली इतके तुसडे का वागतो….?