- 43
- 1 minute read
आरक्षण : समज – गैरसमज
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 70
काही लोकांना आरक्षण या शब्दाचा फारच तिटकारा आहे. म्हणून ते आरक्षण आणि आरक्षण घेणाऱ्या लोकांचा सतत द्वेष करत असतात. म्हणून सर्व प्रथम आरक्षण काय आहे हे आपण समजून घेऊ.
आरक्षण या शब्दाची साधी व्याख्या आहे. जे समाज समूह आपल्या समाजात वंचित घटक म्हणून राहिले होते त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यात विशेष संधी देण्यात यावी. ही तरतुद आपल्या संविधानाच्या कलम १५ (४) आणि १६ (४) मध्ये अंतर्गत आहे. यानंतर १९९० मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी वर्गातील जातींना सुद्धा आरक्षण दिले गेले. या तिन्ही वर्गातील लोकांची संख्या एकूण ८५ % होते. या ८५% लोकांना फक्त ५० % आरक्षण आहे आणि उर्वरित १५ % लोकांना ५० % जागा खुल्या आहेत. तरी या देशात ज्या लोकांना आरक्षण मिळत नाही ते ओरडून सांगतात की आरक्षण बंद झाले पाहिजे.
*आरक्षण केव्हापासून आहे?*
पूर्वी या देशातील समाज चार वर्णात विभागल्या गेला होता. ते चार वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे होते. ही व्यवस्था सुद्धा आरक्षणावरच आधारित होती.या व्यवस्थेत फक्त ब्राह्मणांनाच शिक्षण घेण्याच अधिकार होता. ते त्यांचे आरक्षण होते. क्षत्रियांना लढण्याचे अधिकार आणि वैश्यांना व्यापार उद्योग करण्याचा अधिकार होता. हे त्यांचे आरक्षण होते. विशेषतः वरील तिन्ही वर्गातील/ वर्णांतील लोकांना त्यांच्या व्यवसायातून मिळकत मिळत होती. त्यांना मिळणाऱ्या या आरक्षणाचा त्यांना हा फायदा होत होता. हे आरक्षण या तिन्ही वर्गांनी/ वर्णांनी पाच हजार वर्षे उपभोगले.
शूद्रांना सुद्धा या व्यवस्थेत आरक्षण होते. ते आरक्षण म्हणजे त्यांनी वरील तिन्ही वर्णातील जनतेची मोफत सेवा करावी, मोबदला मागू नये. समजा वरील वर्गातील लोकांची सेवा करताना जर एखादा शूद्र भुकेने व्याकूळ झाला असेल आणि वरील उच्च वर्णातील व्यक्तीच्या दारात तो शूद्र भाकरीसाठी याचना करत असेल आणि त्या उच्च वर्णीय व्यक्तीचे जेवण झाले असेल तर त्या व्यक्तीने दात कोरून अन्नाचे कण त्या शूद्रांच्या हातावर टाकावेत आणि त्या शूद्राने ते खावून आपली भूक भागवावी. ही होती आमची महान समाज व्यवस्था आणि महान संस्कृती, तरी आम्ही आरक्षणाचा विरोध करतो? (*संदर्भ- डॉ आ ह साळुंखे*)
*तुम्ही शाहू-आंबेडकरांचे विरोधकच*
राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात १९०२ साली सर्व कमजोर घटकांना आरक्षण दिले होते. तुम्ही या लोकांना आरक्षण का दिले असे त्यांना प्रश्न विचारला होता. तेव्हा महाराजांनी प्रत्यक्ष घोड्यांच्या पागेत नेऊन त्या प्रश्न कर्त्याला आपले धोरण पटवून दिले. तुम्ही आरक्षण चुकीचे आहे असे जर म्हणत असाल तर तुम्ही राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करत आहात. पर्यायाने तुम्ही संविधान विरोधी आहात.
*आरक्षण आपल्याच देशात आहे?*
आरक्षण ही व्यवस्था जगातील २९ देशात आहे. परंतु भारतात ज्या पद्धतीने आरक्षणाचा विरोध होतो तसा कुठेही होत नाही. याचे एकच कारण की या देशातील वर्णव्यवस्थेने निर्माण केलेली विषमतेची मानसिकता अजून आमच्या डोक्यातून गेली नाही. संविधानाने रूजवलेला सामाजिक सलोखा आम्ही अजून मान्य करायला तयार नाही. अजूनही आमच्या रक्तात जातीय अहंकार साचून आहे. आरक्षण हे सामूहिक न्यायाचे तत्व आहे, कुणाचा लाड पुरविण्यासाठीची ती तरतुद नाही. हे आम्ही समजून घेतले पाहिजे. आरक्षण हे येथील अन्यायकारी समाज मूल्यांना पायबंद घालण्यासाठी केलेली संविधानिक व्यवस्था आहे. संविधानाने दिलेला नवा मानवतावाद म्हणजे आरक्षण ! हे तुम्हाला समजून घ्यावेच लागेल. धन्यवाद!
*********
*प्रा माधव सरकुंडे*
ReplyForward Add reaction |
0Shares