एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद*
नाशिक, प्रतिनिधी : उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर आधारित “उपवर्गीकरण, क्रिमीलेअर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका” या माजी न्यायाधीश तथा सुप्रसिद्ध लेखक अनिल वैद्य लिखित ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. नाशिक येथील रॉयल हेरिटेज हॉटेलच्या सभागृहात आयोजित उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या सभेत हा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी शहरातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना लेखक अनिल वैद्य यांनी एका महिन्याच्या अल्पावधीत ग्रंथाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित करण्याची वेळ आली, याचे श्रेय समाजबांधवांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाला असल्याचे सांगून सर्व वाचक, कार्यकर्ते आणि समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. डॉ. कुणाल वाघ यांनी “उपवर्गीकरण, क्रिमीलेअर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका” हा ग्रंथ आंबेडकरी चळवळीचे रसायन असल्याचे सांगितले. उपवर्गीकरण, क्रिमीलेअर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका समजून घेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने हा ग्रंथ अभ्यासपूर्वक वाचण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी लेखक अनिल वैद्य (माजी न्यायाधीश) यांचे अभिनंदन करून त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाचे कौतुक केले. उपवर्गीकरणाच्या विषयावर वस्तुनिष्ठ आणि संविधाननिष्ठ भूमिका समाजापर्यंत पोहोचविण्यात हा ग्रंथ महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर प्रकाश पगारे, किशोर घाटे , बाळासाहेब शिंदे, संजय साबळे प्रा डॉक्टर कुणाल वाघ, अर्जुन नाना पगारे, प्रवीण गांगुर्डे,अनिल अनिल गांगुर्डे, सनी रोकडे ,किशोर गांगुर्डे, आदेश पगारे,अरुण दोंदे रवी सोनवणे, घोटीसे, प्रवीण पगारे, अविनाश गायकवाड, डॉक्टर प्रशांत घोडेराव, रवि सोनवणे, भीमराव आव्हाड, संदीप सावंत, प्राध्यापक डॉक्टर कोलते, कविता तेजाळे साहिल सोनवणे, वैभव शार्दुल, कविता पवार आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते.