फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही न लिहिता, काही शे शब्दांच्या लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.
खालील चित्रातून हाच धडा आहे की मोठी बोट टिकवली तर त्यात बसलेले सारे टिकतील. पण त्याच्य बोटीच्या फळया काढून प्रत्येकाला वाटत आपण आपली स्वतंत्र बोट बनवावी तर कोणाचे खरे नाही.
दावोसला गेली ५० वर्षे जमणारे बोटीतील लोक आहेत जे आता फळ्या कापून आपापली छोटी बोट बनवत आहेत. हे तेच लोक आहेत ज्यांनी आपले हात पिरगळून आपल्याला पटवले होते की सर्वांसाठी एकच एक मोठी बोट कशी फायद्याची आहे…ज्यातून जागतिकीकरण घडले.
_________________
जगसमोरील, कोणत्याही एका सुट्या राष्ट्रासमोरील नाही, अनेक प्रश्न असे आहेत की जे सामुदायिकपणेच सोडवले जाऊ शकतात. त्या प्रश्नाचे स्वरूपच असे आहे की कितीही सामर्थ्यवान राष्ट्र असले तरी ते राष्ट्र एकट्याच्या ताकदीवर ते प्रश्न सोडवू शकत नाही. अगदी अंशतः सोडवायचे म्हटले तरी सर्वांचे सहकार्य हवे. लाभ झाला तर सर्वांना. नाहीतर कोणालाही नाही.
उदा. पर्यावरण, भू राजनैतिक ताणतणाव , एकमेकांच्या देशात स्थायिक झालेले किंवा नोकरी करणारे नागरिक, वाढणारे संरक्षण खर्च, आयात करांचा अस्त्रासारखा वापर न करणारा जागतिक व्यापार, जागतिक वित्त क्षेत्रातील अस्थिरता, क्रॉस बॉर्डर आतंकवाद, क्रिप्टो आणि तत्सम डिजिटल आंतरराष्ट्रीय चलने भली मोठी यादी काढता येईल.
________________
याच अंतरदृष्टीचे एक्सटेंशन देशांतर्गत प्रश्नांना देखील लागू होऊ शकते. सामुदायिक प्रश्नांना, सामुदायिक सहमतीतून सामुदायिक प्रयत्नांतून…सर्वांना लाभदायक उत्तरे
,,,उदा. सामाजिक सुरक्षा, शहरीकरण, अविकसित भूभागातून होणारे स्थलांतरण, देशात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे / नद्यांचे नियोजन, रेल्वे सारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा, delimitation झाल्यावर होणारे गंभीर राजकीय ताणतणाव…
पण जसे जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे तसे देशातील राज्ये आपापली धोरणे, आणि विविध साधनसामुग्री कशी वापरायची ते ठरवत आहे.
,__________________
हे खरेतर तेथे देखील थांबत नाहीये
आज प्रत्येक प्रौढ स्त्री-पुरुषाला वाटत आहे की आपण आपले प्रश्न स्वतः सोडवू शकतो. अनेक प्रश्न असे आहेत की जे फक्त सामुदायिकपणेच सोडवले जाऊ शकतात
संजीव चांदोरकर (२१ जानेवारी २०२६)