• 7
  • 1 minute read

काही ऐतिहासिक सत्ये व तथ्ये

काही ऐतिहासिक सत्ये व तथ्ये

काही ऐतिहासिक सत्ये व तथ्ये

      छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , छत्रपती राजाराम महाराज , छत्रपती ताराराणी , छत्रपती ताराराणी , छत्रपती शाहू महाराज सातारा , महाराणी जिजाबाई कोल्हापूर , सरसेनापती उमाबाई दाभाडे , अहिल्याबाई होळकर यांचे समकालीन शत्रू मोगलशाही , आदिलशाही , कुतुबशाही , पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज होतेच .या मधील प्रमुख नांवे सरदार अफझलखान व मोगल सम्राट औरंगजेब बादशहा यांच्या कबरींची उत्तम देखभाल दुरुस्ती राज्य व केंद्र सरकारने केली पाहिजे . जतन केली पाहिजे . तसेच तेथे अस्सल इतिहास लिहून दर्शनी भागात मराठी हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये मोठे बोर्डस् लावले पाहिजेत . शत्रू किती बलाढ्य होते ही माहिती नवीन पिढीतील युवकांना समजली पाहिजे . आजही स्वतंत्र भारतात विजयाचे प्रतीक म्हणून मोठमोठे स्मारके उभारली जातात . स्मारके हे शौर्याचे प्रतिक व प्रेरणादायी स्थळ असते . शत्रूंचे गुणगान गाण्यासाठी युद्ध स्मारक नसते . कारगिल विजय स्मारक हे भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे व विजयाचे अभिमानास्पद स्मारक आहे . त्यात पाकिस्तानचे महात्म्य वर्णन नाही. या स्मारकांना भेट देणारे नागरिक व युवक प्रेरणा घेतात . याच प्रकारे अफझलखान व औरंगजेब यांच्या कबरींचे जतन हे भारतीयांच्या महापराक्रमाचे , सन्मानाचे व गौरवशाली विजयाचे स्मारक आहे . याच कारणाने भारतीय युवकांनी स्वराज्य संकल्पक लखूजी राजे जाधवराव समाधी सिंदखेडराजा व स्वराज्य संकल्पक शहाजीराजे समाधी होदेगिरी जिल्हा शिमोगा कर्नाटक येथे नतमस्तक झाले पाहिजे . हिंदू युवकांनी मुस्लिम शत्रूंच्या कबरी उध्वस्त करण्यापेक्षा भारतभर पसरलेल्या मध्ययुगीन काळातील हिंदू राजांच्या समाध्या उत्तम प्रकारे जतन करण्याची गरज आहे . रघुजी राजे भोसले , बिंबाजी राजे भोसले , परसोजी राजे भोसले , दामाजी गायकवाड , सरसेनापती हंबीरराव मोहिते , सरसेनापती खंडेराव दाभाडे , पहिले बाजीराव पेशवे इत्यादी महान व्यक्तींच्या बाबतीत आम्ही उदासीन आहोत . पानीपत तिसरे युध्दात मराठ्यांच्या लाखभर सैन्यासह सेनापती सरदार कामी आले . तेथे कालाआम नावाचे एक स्मारक पानीपत येथे आहे . तेथे हजारो भारतीय नतमस्तक होतात . परंतू दुर्दैवाने आम्ही त्याबद्दल वाद निर्माण केलेले आहेत . छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीची दुरवस्था पाहून इंग्रज अधिकारी अक्षरशः रडले होते . ते म्हणाले होते की , ” इंग्रज लोक आपल्या राष्ट्रासाठी कामी आलेल्या घोड्याचे स्मारक अतिशय सुरेख व भव्य बांधतात . तर एकीकडे नवीन स्वराज्य निर्माण करणाऱ्या जगातील एकमेव शूर व महाबलाढ्य लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी अत्यंत ओबडधोबड दगडी बांधलेली आहे . ‘” छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची थोरवी सांगताना युरोपियन इतिहासकारांनी म्हणले आहे की , ” बरेच झाले की छत्रपती शिवाजी महाराज जमीनीवर जन्माला आले . अन्यथा ते जर एखाद्या समुद्र किनारी जन्माला आले असते तर त्यांनी सातही महासागरासह सर्वच पृथ्वी जिंकून मराठेशाही स्थापन केली असती . ” तसे झाले असते तर शिवराजमुद्रा प्रत्यक्षात विश्वव्यापी झाली असती .‌ एवढे स्मारकाचे महत्व आहे .

याशिवाय याच बोर्डवर मोगलशाही , निजामशाही , आदिलशाही , कुतुबशाही , सिद्दी , पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज मध्ये कार्यरत प्रमुख हिंदू मंत्री व सरदार यांची यादी दिली पाहिजे . आर एस एस च्या माध्यमातून औरंगजेब बादशहा कट्टर हिंदू विरोधक होता असे बिंबविल्या जात आहे . त्याच औरंगजेबाच्या प्रशासनात नव्वद पेक्षा अधिक मंत्री व सरदार हिंदू ब्राह्मण राजपूत मराठा होते . तर सोबतच सुमारे ३८ टक्के हिंदू सैनिक होते . औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या केली होती हे खरे आहे . परंतू स्वतः औरंगजेब सच्चा सुन्नी व सुफी मुसलमान होता . या तत्वज्ञानाचा पालनकर्ता होता . इतिहासकारांच्या मते औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यू दंड दिला होता . जे प्राचिन काळापासून भारतात देखील शत्रू करत असताना दिसतात . परंतू औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात यावेत असे आदेश दिले असण्याची शक्यता नाही . ही गोष्ट सर्वांनाच संशयास्पद वाटते . पुढे छत्रपती संभाजी महाराज यांची महाराणी येसूबाई, युवराज शिवाजी ( औरंगजेबाने ठेवलेले नाव शाहू , पुढे छत्रपती सातारा ) व इतर कुटुंबीय कबिला औरंगजेब बादशहाच्या कैदेत त्याच्या मृत्यूपर्यंत १७०७ असतात . या काळात औरंगजेबाने त्यांची महाराणी व युवराजांना शोभेल अशी काळजी घेतली . सुरक्षितता वा अन्य कारणांमुळे त्यांचे तंबूही आपल्या जवळ ठेवले . युवराज शाहूंच्या सर्वच शिक्षणाची व्यवस्था केली . त्यांचे विवाह लावून दिले . महाराणी येसूबाई यांच्या सोबत स्वतःची मुलगी झेबुन्निसा पूर्णवेळ ठेवली . सुमारे वीस वर्षांत एकदाही औरंगजेबाने कैदेत असलेल्या या कुटुंबातील सदस्य वा लोकांना हिंदू धर्म त्याग करून मुस्लीम धर्माचा स्वीकार करावा , अशी विनंती किंवा दमदाटी केली नव्हती . तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यापूर्वी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फक्त दोनच प्रश्न विचारले होते. पहिला — मराठ्यांच्या ताब्यात असलेली सर्व मालमत्ता किती आहे व कुठे आहे . ती आम्हाला द्यावी . दुसरा प्रश्न होता की मोगलशाही मधील कोण कोण प्रमुख सरदार तुमच्या सोबत मिळालेले आहेत . त्यांची नावे सांगा . ही माहिती दिली तर छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यू दंड ऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिली असती . परंतू छत्रपती संभाजी महाराजांनी दोन्ही प्रश्नांची माहिती दिली नाही . औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मुसलमान धर्माचा स्वीकार करावा व जीवदान घेणे , अशा प्रकारे कधींही सूचना केली नव्हती . परंतू औरंगजेब बादशहा त्याच्या जीवनातील सर्व आनंद सुख सत्ता पैसा छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हरवून बसला होता . १६६५ मध्ये आग्रा येथील भेटीत अवघ्या नऊ वर्षांच्या युवराज संभाजीराजे यांना प्रेमाने वागवणाऱ्या औरंगजेबाच्या कल्पनेपलीकडे छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले होते . आपल्या हातून आग्रा येथील भेटीत मोठी घोडचूक झाली होती , याचा सतत पश्चात्ताप औरंगजेबास होत होता .

असे असतानाही १६८९ ते १७०७ दरम्यान महाराणी येसूबाई, युवराज शाहू व इतर शाही मराठा मंडळींना औरंगजेबाने कैदेत असताना देखील सन्मानाने वागवले . कैद झाली तेंव्हा युवराज शाहू सुमारे सात वर्षांचे होते . तर कैदेतून सुटून स्वराज्यात परत आले तेंव्हा सुमारे पंचवीस वर्षांचे होते . या अठरा वर्षात कैदेत असताना देखील औरंगजेब बादशहाने युवराजांना शोभेल असे प्रशासकीय मुलकी व सैनिकी शिक्षण प्रशिक्षण दिले . एका स्वतंत्र राजाला आवश्यक असते एवढे तरबेज केले होते . महाराणी येसूबाई यांच्या सर्वच मानसन्मानात कमीपणा ठेवला नाही .
कदाचित याच कारणाने युवराज शाहू राजे यांच्या मनात औरंगजेब बादशहा बद्दल आदरभाव निर्माण झाला असावा . परिणामी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर युवराज शाहू राजे यांची सुटका होताच ते स्वराज्यात सुखरूप येण्यासाठी त्यांना सुरक्षित प्रवासासाठी सैन्य दिले . युवराज शाहू महाराज प्रथम सरळ स्वराज्यात न येता सरळ खुलताबाद येथील औरंगजेब बादशहाच्या कबरीच्या दर्शनासाठी गेले व कृतज्ञता व्यक्त केली होती . हा इतिहास आहे .
तसेच सरदार अफझलखान याचा मृत्यू झाला तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या मृतदेहावर सन्मानजनक व इस्लामच्या रिवाजानुसार अंत्यसंस्कार करावेत अशी आज्ञा दिली होती . तसेच त्या ठिकाणी कबर बांधण्यासाठी आदेश दिले होते . एवढेच नाही तर कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था होण्यासाठी जवळील गावे जोडून दिले . वंशजांनी देखील या आदेशाची अंमलबजावणी करावी अशी सूचना केली होती . यामुळेच प्रतापगड पायथ्याशी असलेल्या अफझलखान कबरीचे जतन करणे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासमोर नतमस्तक होणे आहे . बहुजन युवकांनी हेच ध्येय ठेवावे .
युवकांनो व विद्यार्थ्यांनो , विनंती आहे की कृपया खरा इतिहास समजून घ्या . सरदार अफझलखान व औरंगजेब बादशहा हे केवळ दोन माणसे नव्हते . तर त्या काळातील जगातील अत्यंत मुत्सद्दी , शूर व प्रचंड श्रीमंत सत्ताधारी होते . तर काही लाखांची फौज बाळगून होते . औरंगजेब बादशहा जगातील सर्वात पावरफूल सत्ताधारी होता . या तुलनेत मराठ्यांच्या ताब्यात केवळ लहानसा प्रदेश व मर्यादित फौज होती . आपल्याकडच्या अनेक उच्च शिक्षित व उच्च वर्णीय इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख साडेतीन जिल्ह्यांचा राजा असाच तुच्छतेने केला आहे . जगातील एक नंबरच्या बादशहाला मराठ्यांनी संपवले आहे हे सत्य महत्वाचे आहे . यात कोणत्याही प्रकारची धर्मांधता नव्हती . एवढेच नाही तर अनेक मोगल बादशहांची आई हिंदू होती .
समारोप — अफझलखान व औरंगजेब हे छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , छत्रपती राजाराम महाराज , छत्रपती ताराराणी यांचे राजकीय शत्रू होतेच . याबाबत दुमत नाही . हे नवीन पिढीतील युवकांना समजण्यासाठी त्यांच्या कबरी सुरक्षित राहणे लिखित इतिहासापेक्षाही जास्त गरजेचे आहे .. कारण तेच समकालीन सत्य असते .
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगातील सर्वात बलवान औरंगजेब बादशहा याच्या विरोधात सन १७०० ते १७०७ छत्रपती महाराणी ताराबाई लढल्या . मराठ्यांचे राज्य भारताच्या चारही बाजूला पोचवण्यासाठी अवघ्या पंचवीस वर्षांच्या विधवा ताराराणी लढल्या . औरंगजेब बादशहाने छत्रपती ताराराणी सोबत तहाचा प्रस्ताव सादर केला होता . परंतू छत्रपती ताराराणी यांनी तो नाकारला . शेवटी छत्रपती ताराराणी यांच्याच काळात औरंगजेबाने अहमदनगर ( अहिल्यानगर ) येथे प्राण सोडला . छत्रपती ताराराणी यांनी पती छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर मराठेशाही पूर्ण ताकदीनिशी सांभाळली . याच कारणाने आम्हाला आजचा भारत देश दिसतो .
भारतीय सनातन धर्मातील सतीप्रथा नाकारुन हाती शस्त्र धारण करून आपल्या पतीच्या निधनानंतर मराठेशाही जीवंत ठेवून वाढवण्यासाठी जिजाऊ , ताराराणी , जिजाबाई कोल्हापूर , सरसेनापती उमाबाई दाभाडे , अहिल्याबाई होळकर , लक्ष्मीबाई यांचे योगदान महान आहे . म्हणूनच मराठ्यांचा इतिहास हा केवळ पुरुषांचाच इतिहास नाही . तर तेवढ्याच महापराक्रमी , मुत्सद्दी व बुध्दीमान महत्वाकांक्षी महिलांचा देखील इतिहास आहे . मोगल इंग्रज यांना मराठ्यांच्या महिलांचा सहभाग व पराक्रम माहीत होता . याच कारणाने त्यांनी पेशवे व काही मराठा सरदारांना हाताशी धरून छत्रपती शाहू महाराजांच्या महाराणी सकवारबाई यांना जबरीने सती दिले . सोबतच ताराराणी यांना राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याची बंदी घातली होती . महाराणी सकवारबाई अत्यंत मुत्सद्दी राजकारणी व उत्तम प्रशासक होत्या . छत्रपती शाहू महाराजांना वारसदार सुपूत्र नव्हते . महाराणी ताराबाई प्रमाणेच सातारा गादी सांभाळून महाराणी सकवारबाई यांनी छत्रपती पदाची जबाबदारी संपूर्णपणे सांभाळली असती . तसे झाले असते तर पुढे मराठे व अब्दाली पानीपत युद्ध झाले नसते . मराठ्यांचे साम्राज्य व हिंदवी स्वराज्य अफगाणिस्तान , नेपाळ , म्यानमार सिमापलीकडे पोचले असते . मराठ्यांनी दिल्लीचे तख्त राखण्याऐवजी मराठा छत्रपती दिल्लीचे बादशहा झाले असते . परंतू दुर्दैवाने अल्पशा स्वार्थापोटी पेशव्यांनी महाराणी सकवारबाई यांना जबरदस्तीने सती दिले . एवढ्यावरच न थांबता लगेच पेशव्यांनी कोल्हापूर राज्य बळकावण्याचा प्रयत्न केला होता . कोल्हापूरच्या मुत्सद्दी महाराणी जिजाबाई यांनी पेशव्यांचा कुटिल डाव उधळून लावला होता . पेशवे तर हिंदूच होते . त्यांनी असे का केले ?? याचेही उत्तर मिळाले पाहिजे . हे उत्तर शोधण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजेत . छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले होते . परंतू नंतर तेच स्वराज्य राखून वाढवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या महिलांना विसरता येणार नाही … त्यांना विनम्र अभिवादन …
स्वराज्य संकल्पक , स्वराज्य निर्माते आणि स्वराज्य संरक्षक महामानवांना विनम्र अभिवादन .
जय जिजाऊ…

– पुरुषोत्तम खेडेकर चिखली

0Shares

Related post

१६ व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना…

१६ व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना…

हुजरेगिरी करणाऱ्यांना प्रतिभावंत म्हणता येणार नाही ! – डॉ. प्रकाश मोगले भाषणातील महत्त्वाचे मु‌द्दे : *…
गद्दार को गद्दार कहना कानूनन अपराध नही है…!

गद्दार को गद्दार कहना कानूनन अपराध नही है…!

यह सच है की….गद्दार को गद्दार कहना कानूनन अपराध नही है…..!        ये सच…
भावी डॉक्टरांच्या भविष्याशी खेळ नको, विधानसभेत मागणी

भावी डॉक्टरांच्या भविष्याशी खेळ नको, विधानसभेत मागणी

शासकीय दंत महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ.दातारकर यांना बडतर्फ करा – डॉ. नितीन राऊत भावी डॉक्टरांच्या भविष्याशी खेळ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *