- 44
- 1 minute read
जनसुरक्षा कायदा म्हणजे अघोषित आणीबाणी.
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 58
ॲड. प्रकाश आंबेडकर : मोहन भागवत, नरेंद्र मोदी एके-४७ आणि टॉमी गन शस्त्रांची पूजा करतात!
मुंबई : महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे ‘अघोषित आणीबाणी’ आहे. या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळी जी चूक केली, तीच गोष्ट भाजपने कायद्याच्या रूपात आणून अघोषित आणीबाणी लादली आहे. याविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मुंबईत राजगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने जनसुरक्षा विधेयकाला यापूर्वीच विरोध दर्शवला होता आणि आता याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. इतर राजकीय पक्षांनीही या लढ्यात सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले.
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप -*
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) गंभीर आरोप केले. सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एके-४७ (AK-47) आणि टॉमी गन यांसारख्या शस्त्रांची पूजा करतानाचे फोटो सगळीकडे उपलब्ध आहेत. भारतीय सैन्यात विशिष्ट सैनिकांनाच ही शस्त्रे वापरण्याची परवानगी आहे. असे असताना आरएसएसकडे ही शस्त्रे कुठून आली? सरकार त्यांच्यावर ‘अर्बन नक्षल’ म्हणून कारवाई करणार आहे की नाही?”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्या शस्त्रपूजेच्या फोटोंवर विरोधी पक्षांच्या शांततेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ज्यांच्याकडे ही शस्त्रे आहेत, त्यांच्यावर या जनसुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे की नाही?” असा सवालही त्यांनी केला आहे. कायद्यानुसार पिस्तूल बाळगणे कायदेशीर आहे, परंतु एके-४७ आणि टॉमी गन यांसारखी शस्त्रे बाळगणे कायद्याने गुन्हा आहे आणि हे राज्य उलथवून टाकण्यासारखे आहे. आरएसएस ही शस्त्रे जवळ बाळगतेय, त्यावर या कायद्यांतर्गत आधी कारवाई करावी, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
*सभागृहात विरोधाचा अभाव -*
जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात आक्रमकपणे विरोध झाला नाही याबद्दल खेद व्यक्त करून ते म्हणाले, लोकांनी समाज माध्यमांवर विरोध केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मीडियासमोर येऊन बोलणे ही ‘नौटंकी’ आहे.
*शहरी नक्षलवाद म्हणजे नेमकं काय?*
कामगारांच्या मोर्च्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या विषयावर लढा उभा केला त्याला तुम्ही
अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? शेतकऱ्यांनी शेतमालाला भाव मिळत नाही, म्हणून त्याविरोधात आवाज उठवला तर त्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? खाजगी सावकाराच्या विरोधात कारवाई करा, ही मागणी केल्यावर त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? सरकार नेमकं कोणाला अर्बन नक्षलवाद ठरवणार आहे?
ज्याच्याकडे शस्त्र, दारुगोळा आहे, त्याला तुम्ही नक्षलवादी ठरवू शकतात कारण, बेकायदेशीर मार्गाने तो राज्याला उलथू पाहतोय. बेकायदेशीर मार्गाने राज्य उलथवणाऱ्यांकडे शस्त्र, दारुगोळा आहे की नाही ते तपासले पाहिजे. शस्त्र, दारुगोळा आरएसएसवाल्यांकडे आहेत. त्यांनी सार्वजनिकरित्या ती जाहीर केली आहेत. त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाची कारवाई करणार आहेत का? हा मोठा प्रश्न आहे.
जर एखाद्या सामान्य नागरिकाने आरएसएसच्या शस्त्र, दारुगोळा याची मोहन भागवत, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस शस्त्रांची पूजा करताय याविरोधात न्यायालयात दाद मागितली आणि यांना अर्बन नक्षलवादी म्हणून जाहीर करा, अशी मागणी केली, तर त्या माणसाच्या मागे या सर्व राजकीय विरोधी पक्षांनी उभे राहिले पाहिजे. तरच तुम्ही खऱ्या अर्थाने विरोधक आहेत, हे दिसेल.
—-
0Shares