या सर्व काळात एक प्रश्न सतत विचारला गेला:
फक्त काही दशकांपूर्वी अख्खा वंश कॉन्सन्स्ट्रेशन कॅम्पस आणि तत्सम निघृण यातनांतून गेल्यानंतर , स्वतःच्या वंशाचे लाखो बळी गेल्यानंतर, ज्यू वंशाच्या माणसांना निरपराध पॅलेस्टाईन लोकांचा इतक्या अमानवी/ क्रूर पद्धतीने , एकढ्या मोठ्या प्रमाणावर संहार कसा करता येऊ शकतो ?
युद्धभूमीवर शत्रू पक्षाच्या सैनिकांनी एकमेकांचा जीव घेणे समजता येते. चुकून एखादा बॉम्ब नागरी वस्तीवर देखील पडतो. पण निरपराध नागरिकनां त्यांच्या राहत्या घरावर बॉम्ब टाकून मारणे ? इस्पितळांवर टिपून बॉम्ब टाकणे ? अनाकलनीयच नाही तर नर्व्हस करणारे आहे. स्वतः यातनातून गेलेला माणूस स्वतःहून दुसऱ्याला तशाच किंवा अधिक अमानवी यातना देऊ शकतो ?
________
पण हे देखील खरे आहे की असा “आपोआप”वाद कधीच अस्तित्वात नसतो
सून म्हणून स्वतःच्या सासूकडून छळ सहन केलेली स्त्री, स्वतः सासू झाल्यावर आपल्या सुनेला “आपोआप” चांगलेच वागवेल याची खात्री नसते
आपल्या कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे भौतिक आयुष्यात ससेहोलपट झालेला , नंतरच्या आयुष्यात ज्यावेळी इतरांचे कष्ट विकत घेतो त्यावेळी “आपोआप” योग्य मोबदला देईलच याची खात्री नसते
एखाद्या भूभागात भाषिक / वांशिक / धार्मिक अल्पसंख्य असल्यामुळे दहशतीत राहिलेले , ज्यावेळी स्वतः बहुसंख्यांकांमध्ये मोडणाऱ्या दुसऱ्या भूभागात राहू लागतात त्यावेळी “आपोआप” तेथील अल्पसंख्यांकबद्दल संवेदनशील असतील याची खात्री नसते
हि यादी तुम्ही देखील वाढवू शकता
_________
वरील आणि तत्सम गोष्टी व्यक्तींच्या / समूहाच्या voluntary चांगुलपणावर सोडता येणार नाहीत ;
मानसिकता घडवणे , संस्कार महत्वाचे आहेत, ते केलेच पाहिजेत. पण विविध ताकदवर व्यक्ती निरपेक्ष प्रणाली, सिस्टीम जागेवर असणे अधिक महत्वाचे
मानवी मूल्यांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या कायद्याला / त्याची अमलबजावणी करणाऱ्या दंडसत्तेला / आणि त्याला mandet पुरवणाऱ्या राजकीय सत्तेला … चान्गले संस्कार पर्याय नाही होऊ शकत, फक्त पूरक असतात.
म्हणून काही एका मूल्यधरित विचारांवर , आदर्शावर, मूल्यांवर चालणाऱ्या पक्ष / संघटनेचे महत्व आहे जो पक्ष / संघटना राजकीय सत्तेबद्दल तुच्छताभाव न बाळगता मानवतावादी मूल्याधारित सत्ताकारण करेल
त्याला ना पर्याय, ना शॉर्टकट
प्रश्न तर अजून पुढचा देखील आहे. कारण हे आपण आज जे जिवंत आहोत तेवढ्या पिढीपुरते करून पुरेसे नाही ;
मूल्याधारित वैचारिक बैठक / मानवी मूल्ये / संवेदनशीलता यांचे पिढ्यन्पिढ्या पुनरुत्पादन कसे होणार हे अधिक मोठे आव्हान आहे. हा बॅटन मागून येणाऱ्या पिढ्यांकडे, जमिनीवरील चिखलात पडून, गाडला जाऊन न गमावता, कसा हॅन्डओव्हर करणार ? यात अपयश आल्यावर फक्त तरुण पिढीला दोष देणे होते. ते सर्वात सोपे आहे.
इतिहास साक्ष आहे ; आता कायमचे स्थिर झाले आहेत असे वाटणारे, “आदर्श” समाज एक दोन पिढ्यात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात. रसातळाला जातात. आज देखील जगातील अनेक देशात, आपल्या देशात काय चालले आहे याचा मागोवा घेतला तरी कळेल.
संजीव चांदोरकर (१५ ऑक्टोबर २०२५)