अल्फाबेट, ॲमेझॉन, ॲपल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिआ आणि टेस्ला या सात टेक कंपन्यांना अमेरिकेत “मॅग्नीफिसंट सेवन” म्हटले जाते. यांनी जगावर गेली अनेक दशके अधिराज्य गाजवले आहे. अजूनही गाजवत आहेत.
त्यांची गाभ्यातील ताकद आहे सतत फॉरवर्ड लुकिंग तंत्रज्ञान विकासात मोठी भांडवली गुंतवणूक करत राहणे. तंत्रज्ञान विकासातील भांडवली गुंतवणुकीत प्रचंड जोखीम असते. कारण त्यातून हाती नक्की काय लागेल याबाबत अनिश्चितता असते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या विकासात या कंपन्या फक्त २०२५ मध्ये ७०० बिलियन डॉलर्स गुंतवत आहेत. २०३० पर्यंत ३००० बिलियन्स डॉलर्स गुंतवले जाणार आहेत.
बाहेरून भांडवल उभारणी एक भाग झाला. पण कंपनीचे स्वतःचे संचित भांडवल कंपनीचे खरे सामर्थ्य असते. आपल्या आजच्या पोस्टचा विषय हा आहे. कंपन्या संचित नफ्याचे नक्की काय करतात.
____
भारतातील टेक कंपन्या काही कमी नफा कमावत नाहीत. वर्षानुवर्षे कमवत आहेत. काय करतात त्या संचित भांडवलाचे?
या कंपन्या स्वतःचे संचित भांडवल वापरून स्वतःचेच शेअर्स बायबॅक करत राहतात. पेड अप भाग भांडवल कमी झाले की काही न करता आर्निंग पर शेयर वाढतो आणि शेयरची किंमत भविष्यात वाढते. मग टॉप मॅनेजमेंट त्यांना मिळालेले स्टॉक ऑप्शन्स विकून अधिक पैसे कमावू शकतात…मिळाले चॉकलेट की बकाबका तोंडात कोंबणाऱ्या शाळकरी मुलाची आठवण होते मला.
भारताची नावाजलेली टेक कंपनी इन्फोसिस गेली आठ वर्षे सातत्याने स्वतःचे शेअर्स बायबॅक करत आहे. अलिकडे जाहीर झालेला बायबॅक पाचवी खेप
वर्ष आणि किती संचित भांडवल बायबॅक साठी वापरले गेले त्याचे आकडे (कोटी रुपयात)
२०१७: १३,०००
२०१९: १०,०००
२०२२: ९,२००
२०२३: ९,३००
२०२५: १८,०००
आणि इन्फोसिसचे नारायणमूर्ती देशातील तरुणांना राष्ट्र उभारणीसाठी दिवसाला दहा तास काम करायला सांगतात.
टाटा कन्सल्टन्सी , दुसरी लीडिंग टेक कंपनी, शेयर बाय बॅक (कोटी रुपयात)
२०१७: १६,०००
२०१८: १६,०००
२०२०: १६,०००
२०२२: १८,०००
२०२३: १७,०००
_______
जगातील तंत्रज्ञान क्षेत्रात नक्की काय घडत आहे हे जाणकार सांगतील. मी जाणकार नाही. पण एक सजग नागरिक म्हणून हे कळते की काहीतरी वेगळे आणि गंभीर घडू पाहत आहे. देश म्हणून याला सामोरे जायचे असेल तर महाकाय जोखीम भांडवल लागणार आहे. संचित नफा हे अशा जोखमी शोषून घेऊ शकते.
चीनमध्ये भविष्यवेधी प्लॅनिंग असते. तेथील शासन, ज्या तांत्रिक दृष्ट्या खाजगी कंपन्या आहेत त्यांच्या कॉर्पोरेट प्लॅन्सना देशाच्या भविष्यातील विकास आराखड्याप्रमाणे राबवायला भाग पाडत असते.
गेली काही वर्षे आपल्या देशातील खाजगी कंपन्यांना भांडवली गुंतवणूक वाढवा अशी आवाहने करून राजकीय नेते थकले. पण या कंपन्याना राष्ट्राच्या अजेंड्यापेक्षा आपल्या स्वतःच्या अजेंड्याप्रमाणे जात आहेत.
ना चीन सारखे शासन, ना अमेरीकेसारखे खाजगी क्षेत्र. कोणाच्या जीवावर देश २०४७ ची स्वप्ने पुरी करणार आहे ? पण फक्त स्वप्नांबद्दल बोलायचे डिटेल्स वर काही बोलायचे नाही
संजीव चांदोरकर (२५ सप्टेंबर २०२५)