येरवडा, पुणे : प्रतिनिधी
अखिल वडार बोली भाषा साहित्य संस्था, कोल्हापूर आणि अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन – २०२५ रविवारी, दि. २६ ऑक्टोबर रोजी येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येथे भव्यदिव्य वातावरणात पार पडले.
या ऐतिहासिक संमेलनाचे मुख्य संयोजक ज्येष्ठ साहित्यिक टी. एस. चव्हाण (छ. संभाजीनगर) होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवर उपस्थितीत पार पडले. उद्घाटक म्हणून मा. मनोहर बंदपट्टे, तर संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. प्रकाश जाधव यांनी आपले विचार मांडले. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून निवृत्त उपायुक्त सुरेश विटकर उपस्थित होते.
प्रास्ताविकातून संमेलनाचे महत्त्व आणि उद्दिष्ट मुख्य संयोजक टी. एस. चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यांनी वडार समाजाच्या बोली भाषेच्या जतनासाठी आणि साहित्यिक अभिव्यक्तीला राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी या संमेलनाचे महत्त्व अधोरेखित केले.
पहिल्या सत्रात प्रा. गुलाब वाघमोडे यांनी साहित्य आणि समाजातील नात्यावर भाष्य केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूरचे माजी नगरसेवक धर्मराज घोडके, अंबादास मंजुळे, सुधीर पवार, राजू धोत्रे (संपर्क विभाग, मंत्रालय मुंबई) तसेच मुक्कारी अण्णा अलगुडे यांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी वडार बोली भाषेच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
दुसऱ्या सत्रात “मराठी साहित्यात चित्रीत झालेले वडार समाजाचे चित्र – वास्तव आणि भ्रम” या विषयावर प्रा. गणेश फुलारी यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण केले. या सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. दिलीप जाधव यांनी भूषविले. त्यानंतर “आरक्षण – दशा व दिशा” या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. त्याचे अध्यक्ष तुकाराम माने होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “वडार समाजाला जर विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात करणे अपरिहार्य आहे.”
संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधानाचे रक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “आज देशात काही मनुवादी शक्ती अस्वस्थता निर्माण करत आहेत. अशा काळात समाजाने संविधानावर श्रद्धा ठेवून शिक्षणाचा दीप कायम प्रज्वलित ठेवावा. देवधर्म नव्हे, तर महामानवांचे विचार आणि शिक्षणच समाजाला खऱ्या अर्थाने मुक्त करतील.”
आपल्या वैयक्तिक प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “ज्या मुलाला शाळेत गेल्यानंतर सहा महिने मराठी बोलता येत नव्हतं, तोच आज पुणे विद्यापीठ अंतर्गत प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत
— ही माझी आणि माझ्या समाजाची प्रेरणादायी कहाणी आहे.”
संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी टी. एस. चव्हाण, हरिषदादा बंडीवडार, अशोक पवार, मनोहर मुधोळकर, शांताराम मनोरे आणि पत्रकार रमेश जेठे यांनी अथक परिश्रम घेतले.
संपूर्ण दिवसभर साहित्य, विचार, कविता आणि चर्चेचा उत्सव अनुभवायला मिळाला. या संमेलनामुळे वडार समाजातील नव्या पिढीला साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी दिशा मिळाली असून, समाजाच्या एकतेचे हे खरे प्रतीक ठरले.
— प्रतिनिधी, पुणे
#वडार_बोली_साहित्य_संमेलन #वडार_समाज #साहित्य #संविधान #पुणे