दोन तीन मुद्दे समजून घ्यावयास हवेत.
१. जगड्व्याळ अवाढव्य वित्तीय आणि राजकीय ताकदीच्या जागतिक औद्योगिक , वित्त प्रणालीत म्होरकेपण करणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्तिगत चारित्र्यावर टीका करणे काही गैर नाही.
पण असे समजूया की त्या व्यक्ती व्यक्तिगत आयुष्यात खूप चारित्र्यवान आहेत. तरी या प्रणालीची कोट्यवधी सामान्य जनतेच्या राहणीमानाला आणि पर्यावरणाला गंभीर हानी पोचवण्याची क्षमता कमी होत नसते (इथे आपण राजकीय आर्थिक प्रणाली आणि त्या प्रणालीचे म्होरके यात फरक करत आहोत).
मी भांडवलदार या ऐवजी “म्होरके” असा शब्द जाणून बुजून वापरू इच्छितो. कारण प्रणाली चालवणाऱ्या, समोर न येणाऱ्या अनेक एजन्सी असतात. सरमळकर सारख्या भांडवलदार व्यक्ती फक्त त्याला मानवी चेहरा पुरवत असते.
२. दुसरा मुद्दा आहे बिग कॅपिटलचा. मोठ्या कंपन्यांचा. पर्यावरणाचा प्रलयकारी / परमनंट नाश छोटे / स्थानिक भांडवल किंवा एमएसएमई नाही करत. भांडवल सघन ( कॅपिटल इंटेन्सिव्ह) प्रकल्प करतात. शेकडो, हजारो कोटीचे भांडवल घालणारे प्रकल्प. चित्रपटातील खाण उद्योग या कॅटेगरीत मोडतो.
भांडवलदार सरमळकर फक्त फ्रंट आहे. त्याच्यामागे देशातील बँका, भांडवली बाजार, जागतिक भांडवल, कन्सल्टंट कंपन्या, मर्चंट बँकर्स आणि अर्थातच धोरणेकर्ते, ज्यात नोकरशहा आणि राजकारणी दोघेही मोडतात, असे कॉर्पोरेट भांडवलशाहीतील सारे मागे असल्याशिवाय सरमळकर स्वतःच्या पायावर धड उभा देखील राहू शकणार नाही.
नफेखोर, वाईट्ट प्रवृत्तीची माणसे असतात की नाही. ? तर असतात. पण प्रणालीने त्यांना दत्तक घेऊन मांडीवर घेतल्याशिवाय त्यांना ताकद येऊ शकणार नाही. ४० वर्षाच्या जागतिकीकरणात भारतात देखील ही प्रणाली जागतिक झाली आहे.
ती प्रणाली चित्रपटात एस्टॅब्लिश व्हावयास हवी होती. विशेषतः कोबाल्टचा उल्लेख केल्यावर. जे एक दुर्मिळ खनिज आहे. ज्याचे जागतिक इकॉनॉमिक्स वेगळे आहे. दोन-चार छोट्या प्रसंगातून, संवादातून हे सरमळकर एका प्रणालीची फ्रंट आहे हे एस्टॅब्लिश करणे शक्य झाले असते असे मला वाटते. ज्यांना राजकीय मेसेज द्यायचा होता त्यांच्यासाठी तर ते मस्ट होते
३. मी माझ्या राजकीय अर्थव्यवस्था अन्वयार्थ लावणाऱ्या लिखाणात नेहमी तरुणांना आवाहन करतो, व्यक्तिकेंद्री नव्हे तर सिस्टीमकेंद्री विश्लेषण करायला शिका. त्यासाठी लागणारा दृष्टिकोन विकसित करा. माहिती, वाचन अन्न, तर दृष्टिकोन म्हणजे पचनशक्ति.
आमच्या काळात ठोसे मारण्यासाठी असलेल्या पंच बॅग्जना “टाटा बिर्ला” अशी नावे होती. कळलेच नाही बदल कसा झाला, आता पंच बॅग्जना “अदानी अंबानी” अशी नावे आहेत. नावे बदलली. पण सिस्टीम वाईट वरून अधिक वाईट झाली आहे. अजून दहा वर्षांनी नावांचा तिसरा सेट समोर आलेला असला तर आश्चर्य वाटणार नाही.
अजून एक आफ्रिका खंडात अनेक देशात , खनिजे काढणाऱ्या मायनींग कंपन्या आणि लाखो हेक्टर यांत्रिक शेती करून , लाखो मूल रहिवाशांना देशोधडीला लावणाऱ्या ऍग्रो बिझिनेस कंपन्या आहेत. त्यांना अब्जावधी डॉलर्सचे भांडवल वॉल स्ट्रीट वरील वित्त कंपन्या पुरवतात. त्यांनी पर्यावरणाचे देखील प्रचंड नुकसान केले आहे. त्या साऱ्या बलाढ्य अब्जावधी डॉलर्स भांडवलवाल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना आडनावे नसतात. हे अकादेमिक ज्ञान नाही. हे सारे भारताच्या घरात ऑलरेडी आले आहे.
__________
वरील पोस्टसाठी “दशावतार” सिनेमा फक्त निमित्त आहे. वरील पोस्टमुळे दशावतार सिनेमाचे , राजकीय सिनेमा म्हणून असणारे महत्व तसूभरही कमी होत नाही.
खूप शुभेच्छा “दशावतार”च्या तरुण चित्रपटकर्मीना !
संजीव चांदोरकर (२३ सप्टेंबर २०२५)