- 16
- 1 minute read
मनुस्मृती संपलेली नाही, ती आधुनिक रूपात जिवंत आहे.
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 40
मनुस्मृती संपलेली नाही, ती आधुनिक रूपात जिवंत आहे.
१९२७ साली महाडच्या चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली.
तो केवळ एका ग्रंथाचा निषेध नव्हता, तर मानवविरोधी सामाजिक व्यवस्थेविरुद्धचा ऐतिहासिक विद्रोह होता.
आज जवळपास शंभर वर्षांनंतर आपण स्वतःला आधुनिक, लोकशाहीवादी आणि संविधानप्रिय म्हणवतो.
मात्र प्रश्न असा आहे की, मनुस्मृती खरंच संपली आहे का, की तिने फक्त नवं रूप धारण केलं आहे?
मनुस्मृती म्हणजे नेमकं काय?
मनुस्मृती म्हणजे फक्त जातिव्यवस्थेचं पुस्तक नव्हतं. ती एक अशी विचारप्रणाली होती जी, जन्मावरून माणसाची किंमत ठरवत होती. काहींना अधिकार, काहींना केवळ कर्तव्य देत होती. प्रश्न विचारणं गुन्हा ठरवत होती आणि असमानतेला धर्म व परंपरेचं पवित्र कवच देत होती. आज हे सगळं उघडपणे लिहिलेलं नाही, पण व्यवस्थेत, भाषेत आणि सामाजिक व्यवहारात खोलवर रुजलेलं आहे.
Merit च्या नावाने चालणारी नवी मनुस्मृती:
आज “उच्च–नीच” असं कोणी उघड बोलत नाही. पण merit, quality, deserving या शब्दांच्या आडून असमानतेचं समर्थन केलं जातं. ज्याला, पिढ्यानपिढ्यांची संपत्ती, चांगल्या शाळा, सामाजिक नेटवर्क, सुरक्षित वातावरण, हे सगळं जन्मतः मिळालं, तो गुणवान ठरतो. ज्याला ते कधीच मिळालं नाही, तो अयोग्य. “जन्म नाकारल्याचं भासवत, जन्मालाच पुन्हा निर्णायक बनवणं, ही “आधुनिक मनुस्मृती” आहे.
“जात मानत नाही” पण जातीत जगणारा समाज:
आजचा सुशिक्षित मध्यमवर्ग म्हणतो “मी जात मानत नाही.” मात्र लग्न, घर घेणं, सामाजिक वर्तुळ, व्यावसायिक भागीदारी, या सगळ्या ठिकाणी जात अजूनही निर्णायक ठरते. जात नाकारली जाते भाषेत, पण स्वीकारली जाते व्यवहारात.”हीच अदृश्य पण प्रभावी मनुस्मृती आहे.”
संविधान स्वीकारलं, पण समानता नाकारली.
संविधान दिन साजरा होतो. बाबासाहेबांचे फोटो लावले जातात. पण, आरक्षणावर प्रश्नचिन्ह, वंचितांच्या हक्कांवर संशय, स्त्री स्वातंत्र्यावर नैतिक पहारा, संविधान स्वीकारलं जातं प्रतीक म्हणून, पण नाकारलं जातं अंमलबजावणीच्या वेळी. “ही दुटप्पी वृत्ती म्हणजे संविधानविरोधी मनुस्मृतीचं आधुनिक रूप”
स्त्रीसाठी “अपग्रेडेड” मनुस्मृती:
आज स्त्री शिकते, कमावते, निर्णय घेते, पण अटींसह. मर्यादेत राहा, कुटुंबाच्या चौकटीत, परंपरेच्या नावाखाली ही उघडी गुलामी नाही का? ही सुसंस्कृत नियंत्रण व्यवस्था आहे, आणि ती अधिक धोकादायक आहे.
न्यायव्यवस्थेतली सामाजिक विषमता:
कायद्याने सगळे समान आहेत. मात्र वास्तवात? गरीबावर कडक कारवाई श्रीमंतावर सौम्य दृष्टी (निबंध लिहून पण सोडून देतात.) वंचितांची चारित्र्य तपासणी, सत्ताधाऱ्यांचा हेतू समजून घेणे ,जर यांना पुरक असेल तर सर्वच माफ, न्याय जेव्हा सामाजिक पार्श्वभूमीनुसार बदलतो, “तेव्हा मनुस्मृती न्यायालयात शिरलेली असते” धर्म, राष्ट्र आणि संस्कृतीच्या नावावरची दडपशाही आज प्रश्न विचारणं संशयास्पद ठरतं. “मतभेद म्हणजे देशद्रोह” “देश, धर्म आणि संस्कृती हे माणसापेक्षा मोठे ठरवले जातात. हा मनुस्मृतीचा सगळ्यात आक्रमक अवतार आहे” जिथे माणूस “दुय्यम” आणि ओळख(वशीला) “प्रधान” होते.
संविधान चळवळीचा स्पष्ट संकल्प:
आज मनुस्मृती जाळायची म्हणजे? ग्रंथ नव्हे, मानसिकता जाळणं परंपरा नव्हे, असमानता नाकारणं
श्रद्धा नव्हे, अंधभक्तीला विरोध करणं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली कारण ती मानवतेच्या विरोधात होती. आज जी कोणतीही विचारसरणी, माणसाला जन्मावरून कमी लेखते, समानतेला धोका मानते,
संविधानाला दुय्यम ठरवते,ती आधुनिक मनुस्मृतीच आहे, आणि तिचा लोकशाही मार्गाने, संविधानाच्या चौकटीत, ठामपणे प्रतिकार केला पाहिजे.
मनुस्मृती संपली नाही.
ती बदलली आहे, सुसंस्कृत झाली आहे, आधुनिक झाली आहे. आजच्या मनुस्मृतीचे दृष्य स्वरूप म्हणजे “ईव्हीएम.” या मनुस्मृती मुळे हुकूमशाही जवळपास आल्यातच जमा आहे. ती ओळखणं, नाकारणं आणि संविधानाच्या बाजूने उभं राहणं हीच आजच्या काळातील खरी सामाजिक क्रांती आहे.
कांबळेसर बदलापूर ठाणे
0Shares