तुम्ही कोरोना महासाथ अनुभवली आहे ; त्या काळात तुम्ही कोणाचा धावा करत होता? शासकीय संस्थांचा , नागरपालिकांचा, सरकारी इस्पितळांचा , डॉक्टर्सच. बरोबर? कोण्या अंबानी, अदानी, टाटा, बिर्लांचा नाही !
पावसाळ्याच्या मोसमात हिमालयापासून , ते सह्याद्रीपर्यंत अनेक नैसर्गिक आपत्ती घडतात किंवा अतिवृष्टी, दुष्काळ, भूकंप कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत तुमचे घर दार, शेती उध्वस्त होते. त्यावेळी कोण धावून यावे असे वाटते ?
आपल्या मायबाप सरकार धावून यावे असे वाटते ; कोण्या अंबानी, अदानी, टाटा, बिर्लां नाही !
डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे, आंतरराष्ट्रीय ताणतणावांमुळे निर्यात कमी झाली तर निर्यातदारांना, आणि अर्थव्यवस्था मंदावून आपल्या मालाचा उठाव होत नसेल तर
कोणी बेल आउट पॅकेजेस द्यावीत असे वाटत ? सरकारने ; कोण्या अंबानी, अदानी, टाटा, बिर्लांने नव्हे
ही झाली फक्त काही उदाहरणे. अशी बरीच सांगता येतील
तुम्ही नागरिक ज्यावेळी संकटात सापडतात त्यावेळी फक्त आणि फक्त मायबाप सरकराचाच धावा करतात ; कोण्या अंबानी, अदानी, टाटा, बिर्लांचा नाही !
स्वयंसेवी संस्था असतात, चांगली माणसे असतात. पण त्या शासनाला पर्याय कधीच होऊ शकत नसतात.
कायदेशीर, नैतिक दृष्टया, सामाजिक, राजकीय निकषांवर तुमचा तो हक्क आहे.
लेट मी रिपीट. तुमचा घटनादत्त हक्क आहे. तुम्ही या देशाचे सर्व अर्थाने मालक चालक आहात.
_______
मुद्दा असा आहे कि सगळे जण संकटसमयी आपल्या शासनाने आपल्याला मदत करावी हि अपेक्षा करतात पण ते शासन सक्षम कसे होईल, किंवा राहील याबद्दल आपले काहीही म्हणणे नसते
आपल्याला मदत हवी त्यावेळी शासन एका रात्रीत सक्षम होऊ शकत नाही हे लक्षात घ्या; ते ३६५ दिवस सक्षम असेल तरच संकटाच्या दिवशी / काळात आपल्याला मदत करण्यास सक्षम असू शकते
त्यासाठी किमान दोन गोष्टींची गरज आहे
(१) शासनांकडे भरपूर वित्तीय सामुग्री असावयास हवी. म्हणजे मग आपण देशातील करआकारणी व कर संकलनाबद्दल बोलावयास हवे. ते आपण बोलत नाही.
(२) सर्व प्रकारच्या सार्वजनिक संस्था, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, वैद्यकीय रुग्नालये, मंत्रालय, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालये यामध्ये सक्षम, टॅलेंटेड पब्लिक स्पिरिटेड तरुण अधिकारी गेले पाहिजेत. त्यांच्याकडे आवश्यक तो कर्मचारी वर्ग असावा, त्याच्या कार्यात त्यांना पैसा कमी पडू नये. पण यावर देखील चर्चा होत नाहीत.
_________
आपला प्रॉब्लेम हा आहे की संकट काळात आपलयाला शासन सक्षम हवंय पण गेली काही दशके विशिष्ट आर्थिक तत्त्वज्ञानाने शासनाला पूर्णपणे पंगू बनवले आहे हे आपल्याला माहित असून उमजत नाहीये !
शासकीय अस्तित्वाला सर्वत्र विरोध करायचा आणि संकटात असले कि शासनाला भरीस पाडायचे हा कॉर्पोरेट्सचा दुटप्पीपणा जगजाहीर आहे;पण त्यात त्यांचा स्वार्थ आहे. पण सामान्य नागरिकानी दुटप्पी राहण्याची आवश्यकता नाही ना ?
श्रीमंत/ उच्च/ मध्यमवर्गाचे देखील काहीबाही नुकसान होते. पण त्यांच्यामध्ये तगून जाण्याची क्षमता आहे. संचित साधनसामुग्री आहे. सोशल नेटवर्क आहे. तुम्ही सर्वस्वी मायबाप शासनावर अवलंबून आहात…
संजीव चांदोरकर (१३ ऑगस्ट २०२५)