हुजरेगिरी करणाऱ्यांना प्रतिभावंत म्हणता येणार नाही !
– डॉ. प्रकाश मोगले
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
* संमेलनाच्या आयोजकांनी स्पष्टपणे ‘आंबेडकरी साहित्य संमेलन’ असा शब्दप्रयोग केला आहे. * 45 वर्षे बहिष्कृत समाजाच्या उद्धारासाठी बाबासाहेबांनी आयुष्य वेचले. मूकसमाज आपल्या व्यथा बोलू लागला. यातून नव्या संस्कृतीचा नव्या साहित्याचा उदय झाला. त्याची प्रेरणा बाबासाहेबांचे विचार व कार्य होते. त्यामुळे या प्रवाहाला आंबेडकरी साहित्य म्हणणे आधिक सार्थ होईल. * समाज, माणसे दलित असू शकतात. पण साहित्य कधीही दलित असू शकत नाही. पाणतावणे, ढसाळ, लिंबाळे आदी साहित्यिकांनी दलित साहित्य शब्दाचा आग्रह धरला. तो चुकीचा आहे. * साहित्य व संस्कृती यांचा घनिष्ठ संबंध असतो. भारतातही दोन संस्कृती नांदत आहेत. एक ऐतखाऊंची आणि दुसरी श्रमिकांची. या दोन संस्कृतीत संघर्ष आहे. या संघर्षाच्या इतिहासाला बाबासाहेब, क्रांती व प्रतिक्रांतीचा इतिहास असे संबोधतात. * समतावादी संविधान व विषमता आधारित धर्मग्रंथ एकत्र जाऊ शकत नाहीत. समता प्रगतीचा तर विषमता राष्ट्रविघातक मार्ग असल्याने आपण कुणासाठी लिहितो व जे लिहितो ती सांस्कृतिक कृती आहे, या जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे. * प्रतिभावंतांना अवलोकन, आकलन आणि अभिव्यक्ती या तीन गोष्टींसाठी मेहनत घ्यावयाची आहे. जीवनानुभवासोबत जगातील उत्तमोत्तम साहित्याचे वाचन लेखकांनी केले पाहिजे. * कवी, कलावंत यांनी राजकारण केले पाहिजे. सक्रिय राजकारणात नसलात तरी राजकारण समजून घेतले पाहिजे. राजकीय विचारधारा व संघटनांवर प्रतिभावंतांनी पाळत ठेवली पाहिजे. * आपल्या समतावादी राजकारणाविरोधात काम करणाऱ्या पक्ष व संघटनांविरोधात लेखक, कवींनी आघाडी उघडली पाहिजे. * लेखण्या मोडा तलवारी हाती घ्या ! हा विचार विधायक नाही. नवनिर्मितीचा नाही. * देश नागविणाऱ्या ‘राजा’पुढे हुजरेगिरी करणारे प्रतिभावंत कसे असू शकतात ? * अशा नाठाळांच्या माती काठी हाणायचे सोडून लाचार साहित्यिक दिल्लीला गेले. तिथे अहंकारी राजाने संमेलनाअध्यक्षांनाच कोपऱ्यात उभे केले. लोचट अध्यक्ष गुमान उभ्या राहिल्या ! * याच अहंकारी राजाच्या सेन्सॉर बोर्डाने ‘मी नथुराम गोडसे बोलतोय !’ या नाटकाला परवानगी दिली. पण नामदेव ढसाळांवरील सिनेमाला परवानगी नाकारली. * फुले आंबेडकरचे नाव घेणारे पण सांस्कृतिकदृष्ट्या मरेपर्यंत हिंदूच राहणारे कधी सार्वजनिक सत्यधर्म व बुद्ध धम्माकडे वळत नाहीत. यांचे पुरोगामीत्व नीट तपासून घेतले पाहिजे. * हिंदूंच्या दहा अवतारात बुद्ध असेल तर हिंदूंच्या देवघरात बुद्ध का नाही ? हा तारा भावाळकरांचा प्रश्न अवतार न मानणाऱ्या बुद्धालाच देवघरात बसविणारा आहे. * गावागावात, भावाभावात, हिंदू मुस्लिमात वैरभाव शासकीय पातळीवरून निर्माण केला जात आहे. प्रेमभावना, शांतता व सलोखा यासाठी आपण लेखण्या झिजवूया. * समारोप त्यांनी साहिर लुधियानवींच्या काव्यपंक्तींनी केला ख़ून अपना हो या पराया हो नस्ल-ए-आदम का ख़ून है आख़िर जंग मशरिक़ में हो कि मग़रिब में अम्न-ए-आलम का ख़ून है आख़िर