- 27
- 1 minute read
नवे वर्ष कसे असावे ! आशा, आत्मपरीक्षण आणि जबाबदारीचा संकल्प
नवे वर्ष कसे असावे ! आशा,आत्मपरीक्षण आणि जबाबदारीचा संकल्प
नवे वर्ष दारात उभे असते तेव्हा केवळ कॅलेंडर बदलत नाही; माणसाच्या मनातही एक नवा आरंभ जन्म घेतो. मागील वर्षाच्या आठवणी, जखमा, अपयश, आनंद, संघर्ष आणि यश यांचा गठ्ठा पाठीवर घेऊन आपण पुढे चाललो असतो. म्हणूनच नवे वर्ष हे फक्त शुभेच्छांचे औपचारिक निमित्त न राहता, आत्मपरीक्षणाचे, बदलाचे आणि जबाबदारी स्वीकारण्याचे पर्व असायला हवे. आजचा समाज वेगवान आहे, पण विचाराने मागे पडत चालला आहे. तंत्रज्ञान प्रगत झाले, साधने वाढली; मात्र संवेदना कमी होत आहेत. नवे वर्ष कसे असावे, हा प्रश्न विचारताना आपण आधी हे ठरवायला हवे की आपल्याला कोणते माणूसपण जपायचे आहे. स्पर्धेच्या गर्दीत माणूस हरवणार नाही, अशी दिशा नवे वर्ष देऊ शकेल का? याचे उत्तर आपल्या वर्तनात दडले आहे.
नवे वर्ष सत्य आणि प्रामाणिकपणाचे असावे. खोट्या आश्वासनांचा, पोकळ घोषणांचा आणि दिखाव्याच्या विकासाचा कंटाळा समाजाला आला आहे. राजकारण असो वा प्रशासन, नातेसंबंध असोत वा सार्वजनिक जीवन, प्रामाणिकपणा हीच खरी सुधारणा ठरू शकते. बोलण्यात नव्हे, तर कृतीत दिसणारे सत्य हेच नवे वर्ष मागते. नवे वर्ष समतेचे आणि न्यायाचे असावे. वाढती विषमता, दुर्लक्षित घटकांचे प्रश्न, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला आणि वंचितांचे वास्तव, या साऱ्यांकडे डोळेझाक करून विकास शक्य नाही. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचेल, ही केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष कृती नवे वर्ष घडवू शकते.
नवे वर्ष संवेदनशीलतेचे असावे. आज आपण पटकन दुखावतो, पटकन चिडतो, आणि तितक्याच पटकन विसरतो. पण माणूस म्हणून आपण ऐकणे, समजून घेणे आणि मदत करणे विसरत चाललो आहोत. एखाद्याच्या वेदनेला शब्दांची नव्हे, तर उपस्थितीची गरज असते. ही संवेदना समाजात रुजवणे हे नवे वर्षाचे मोठे आव्हान आहे. नवे वर्ष विचारशील तरुणाईचे असावे. तरुण हातात भविष्य आहे, पण त्या हातांना योग्य दिशा हवी. केवळ नोकरी, पैसा किंवा प्रसिद्धी हेच ध्येय न राहता समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा निर्माण झाली, तरच नवे वर्ष अर्थपूर्ण ठरेल. प्रश्न विचारणारी, अन्यायाविरुद्ध उभी राहणारी तरुणाई हेच देशाचे खरे भांडवल आहे.
नवे वर्ष पर्यावरण-जागरूकतेचे असावे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास झाला, तर येणारी वर्षे आपल्याला माफ करणार नाहीत. पाणी, हवा, जंगल, जमीन, हे केवळ संसाधन नाहीत, तर आपल्या अस्तित्वाचा श्वास आहेत. नवे वर्ष निसर्गाशी समन्वय साधणारे असावे, संघर्ष करणारे नव्हे. नवे वर्ष जबाबदारी स्वीकारणारे असावे. चूक झाली तर दोष दुसऱ्यावर ढकलण्याऐवजी स्वतःकडे पाहण्याची तयारी असली पाहिजे. नागरिक म्हणून, पालक म्हणून, अधिकारी म्हणून, पत्रकार म्हणून, शिक्षक म्हणून आपापल्या भूमिकेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, तर बदल अटळ आहे.
खरेतर नवे वर्ष कसे असावे, यापेक्षा आपण कसे असावे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. कारण वर्ष बदलते, पण समाज बदलतो तो माणसामुळे. म्हणून या नव्या वर्षात मोठमोठ्या संकल्पांपेक्षा छोटे, पण प्रामाणिक बदल करू या. एकमेकांशी माणूस म्हणून वागू या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया आणि आशा जिवंत ठेवूया. नवे वर्ष हे केवळ शुभेच्छांचे नव्हे, तर संकल्पांचे वर्ष ठरू दे. कारण जेव्हा माणूस बदलतो, तेव्हाच वर्षालाही नवेपण येते. नवे वर्ष आपल्यासाठी आरोग्य, समाधान, लेखणीला नवे बळ, विचारांना नवी दिशा आणि समाजाला स्पर्श करणारे सृजन घेऊन येवो, हीच सदिच्छा. सदैव आपल्या शब्दांतून सत्य, संवेदना आणि सामाजिक भान व्यक्त होत राहो. सर्वांना नववर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
प्रविण बागडे