• 269
  • 1 minute read

अनगरमध्ये महिलेला उमेदवारी अर्ज ही भरू न देण्याच्या कटात गावगुंडांसोबत शासन, प्रशासन ही सामिल….!

अनगरमध्ये महिलेला उमेदवारी अर्ज ही भरू न देण्याच्या कटात गावगुंडांसोबत शासन, प्रशासन ही  सामिल….!

राजन पाटील यास थेट मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद असल्याने अनगर नगरपंचायतची निवडणूक बिनविरुद्ध.....!

अनगरमध्ये महिलेला उमेदवारी अर्ज ही भरू न देण्याच्या कटात गावगुंडांसोबत शासन, प्रशासन ही सामिल….! 
 फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी गोष्ट…..!
 
*.           गावगुंडांना व त्यात ही गावगुंड पाटील असेल आणि त्यास सत्ता, सर्वच प्रशासकीय यंत्रणा आणि थेट मुख्यमंत्री,  गृहमंत्र्यांचा आशीर्वाद असेल तर तो लोकशाही व संविधानात्मक हक्क, अधिकारांचे तीन तेरा कसा वाजवू शकतो, हे आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, अनगर नगरपंचायतच्या निवडणुकीत पाहत आहोत. बिनविरुद्ध निवडून येण्याचा माज असलेला राजन पाटील उज्ज्वला थिटे या महिलेला साधा निवडणुकीचा अर्ज ही भरू देत नाही. यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेचा चालक, मालक होऊ शकतो, हे ही स्पष्टपणे फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. गावगुंड, त्याचे पाळीव गुंड, प्रशासकीय अधिकारी व पाळीवच पोलिस यंत्रणेशी आपल्या व आपल्या परिवाराच्या जीविताची पर्वा न करता सदर महिला निवडणूक अर्ज ही भरत असेल तर तो अर्ज ही हा गावगुंड कसा बाद करू शकतो? हे ही फुले, शाहू, आंबेडकर यांचा उभा महाराष्ट्र पाहत असून ही वेळ देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रावर आणली आहे.
राजन पाटील
         निवडणुकीत मतदान करण्याचा व निवडणुका लढविण्याचा अधिकार भारतीय संविधान प्रत्येक भारतीय नागरिकांना देते. या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या देशातील लोकशाही राज्य व्यवस्था चालते. मात्र मोदीच्या नेतृत्वाखाली देशात भाजप व एनडीएचे सरकार आल्यापासून हे हक्क व अधिकार केवळ संविधानाच्या प्रतिमध्ये आहेत. वास्तवात तसे होताना दिसत नाही. निवडणुकीसाठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरू न देणे, मतदारांना मतदानाचा अधिकार नाकारणे अशा गोष्टी या देशात घडायच्या. पण त्यास ही आता जमाना उलटून गेला आहे. देशातील नागरिक आपल्या संविधानात्मक हक्क, अधिकाराबाबत जागृत झाले आहेत. या गोष्टी साधारणतः बिहार व उत्तर प्रदेश या राज्यात घडायच्या. आता तेथे ही घडत नाहीत. पण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात घडत आहेत. अनगर नगरपंचायत व येथील गावगुंड राजन पाटील हे याचे चालते बोलते उदाहरण आहे.
        राजन पाटील सारखा गावगुंड शरद पवार यांनी आपल्या राजकारणासाठी पोसला. त्याला थेट राजकारणात ही आणला. त्याची गुंडगिरी व दहशतीच्या जोरावर सोलापूर जिल्ह्याचे राजकारण ही केले. मात्र, अशा गावगुंडांना नेहमीच सत्तेचे संरक्षण लागते व शरद पवार ते देवू शकत नसल्याने तो थेट भाजपत गेला. आज सत्ता मिळवून देणाऱ्या गुंडांसाठी, भ्रष्ट्राचाऱ्यांसाठी भाजपमध्ये लाल कार्पेटच्या पायघड्या टाकल्या असून केशव उपाध्यक्ष व माधव भंडारी यासारखे असंख्य लोकांना त्या कामासाठी जुंपण्यात आले आहे.. त्यामुळे राजन पाटीलचे स्वागत झाले व त्याने निवडणूक न लढतच अनगर नगरपालिका भाजपला बिनविरुद्ध जिंकून ही दिली. पण ती देताना त्याने राज्यातील राजकीय वैभवाला मातीत मिळविले आहे. याची लज्जा उभ्या महाराष्ट्राला वाटत असताना भाजप नेते व स्वतः मुख्यमंत्री फडणवीस निर्लज्जपणे गुलाल उधळत आहेत, ही शरमेची बाब आहे.
         
             अनगरमध्ये बिनविरुद्ध निवडणूक: महाविकास आघाडीसाठी ही लाजिरवाणी गोष्ट….!
 
             तीन ते चार वर्षांनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून अनगर नगरपालिकेच्या निवडणुकीत राजन पाटील व त्याच्या गुंडांनी जी गुंडगिरी करीत नगरपंचायतच्या १७ जागा व नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला बिनविरूद्ध निवडून आणले त्याची लाज राज्यातील महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनाला ही (उबाठा ) वाटली पाहिजे. एक गावगुंड पोलिस व अन्य प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून एका महिलेला उमेदवारी अर्ज ही भरू देत नसेल व सदर महिला त्यासाठी संघर्ष करीत असेल तर तिच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका या राजकीय पक्षांनी घ्यायला हवी होती. तिच्या मागे उभे राहण्याचा अर्थ होतो की निवडणुका मोकळ्या व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी उभे राहणे. पण हे महाविकास आघाडीतील कुठल्याही राजकीय पक्षाने केले नाही. याचा अर्थ असा आहे की, राजन पाटील या गावगुंडासमोर महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष हतबल आहेत. या पक्षांना ही राजन पाटील या गावगुंडाच्या विरोधात उमेदवार मिळू नयेत, ही फार शोकांतिका आहे.
            उज्ज्वला थिटे कोण आहेत ? त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे ? त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे ? त्यांच्या मागे कोण आहे ? त्यांना निवडणूक का लढायची आहे ? हे जाणून घेण्यापेक्षा त्या एका गावगुंडांला आव्हान देत उभ्या आहेत, हे कितीतरी महत्त्वाचे आहे. या संघर्षात त्यांच्यासोबत अनगरमधील महिला वर्ग आहे. तसेच त्यांचा मुलगा सतत सावलीसारखा त्यांच्या सोबत असतो. त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या असून याच गटातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. पण तो छाननीमध्ये बाद करण्यात आला असून त्यास उज्ज्वला थिटे यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे.
        
 अनगर नगरपंचायत निवडणूक प्रकिया रद्द करण्यात यावी……!
 
               राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मोकळ्या व निर्भय वातावरणात होत आहेत की नाही माहित नाही. मात्र अनगर नगरपंचायतची निवडणूक नक्कीच मोकळ्या व निर्भय वातावरणात होत नाही. राजन पाटील या गावगुंडाच्या दहशतीखाली ही निवडणूक होत आहे. थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उज्ज्वला थिटे यांना करावा लागणारा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. तसेच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज ही Ak 47 हाती असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संरक्षणात भरला, यावरून हे स्पष्ट होत आहे की, अनगरमधील निवडणुका बिनविरुद्ध का झाल्या आहेत.
          दरम्यान, अनगर नगरपालिका निवडणुक दहशतीच्या वातावरणात होत असल्याने ही निवडणूक तुर्त रद्द करण्यात यावी व मोकळ्या आणि निर्भय वातावरणात पुन्हा प्रक्रिया राबवून घेण्यात यावी, अशी मागणी आता राज्यातील महाविकास आघाडी व अन्य राजकीय पक्षांनी केली पाहिजे. पण अशी मागणी का होत नाही. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष व नेते गप्प का आहेत ? उघड्या डोळ्याने हा तमाशा का पाहत आहेत ? हे कळायला मार्ग नाही.
………………………………………………..
 
राहुल गायकवाड,
प्रवक्ता, महासचिव समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
0Shares

Related post

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

वोट चोरी, घोटाळे आणि गैर मार्गाचा अवलंब करून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजप नंबर एकचा पक्ष….!…
काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता  …
श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता श्री.विद्याधर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *