• 9
  • 1 minute read

भाजपला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही…!

भाजपला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही…!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपची हिंदुत्ववादी भुमिका जगजाहीर आहे. तसेच या शक्ती देश, संविधान व संवैधानिक संस्थांच्या विरोधात आहेत, हे लपून राहिलेले नाही. अशा वेळी भाजपला सत्तेवरून पाय उतार करण्यासाठी विरोधकांची एकजूट होत असेल तर तिचे आंबेडकरवादी विचारांच्या पक्ष, संघटना व नेत्यांनी स्वागतच केले पाहिजे. कारण आंबेडकरी विचारधारा हिच खरी लोकशाही विचारधारा आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे आजोबा आहेत , असे वारंवार म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी तर भाजप विरोधातील आघाडीचे स्वागत करून त्या एकजुटीला अधिक बळ दिले पाहिजे होते. त्यासाठी आग्रही भुमिका घेतली पाहिजे होती. पण तसे होताना एकदा ही दिसले नाही. उलट विरोधकांच्या इंडिया आघाडीवर संधी मिळेल तेव्हा टीका करण्याची संधी ते कधीच वाया जाऊ देत नाहीत. हे वेळोवेळी दिसले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा हा कसला संघ व भाजप विरोध ? असा प्रश्न नेहमीच पडतो. त्याशिवाय राजगृहावरील गाठीभेटी ही अनेक प्रश्नांना जन्म देतात. अन् हे प्रश्न दुर्लक्ष करण्यासारखे नक्कीच नाहीत. अन् नसतात.
जरा मागील निवडणुकीवर नजर टाकली तर….. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 1 लाखापेक्षा अधिक अथवा 1 लाखाच्या आसपास वंचितच्या उमेदवाराला ज्या मतदारसंघात मतं मिळाली त्या मतदारसंघातील विजयी उमेदवाराला किमान 6 लाखाच्या आसपास मतं मिळाली होती. वंचित अन् विजयी उमेदवाराच्या मतांमधील फरक हा किमान 4 ते 5 लाख इतका राहिलेला आहे. त्याशिवाय वंचितला मिळालेल्या त्या मतांमध्ये ओवेशीमुळे मिळालेली मुस्लिम मतं अर्ध्या पेक्षा अधिक होती, हे ही त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समोर आले होते. समोर तर हे ही आले होते की, वंचित अन् एमआयएम युतीमुळे भाजपचा फायदा झाला. निवडणुकीचे गणित इतके स्पष्ट असताना आज पुन्हा ” एकला चलो “ची भुमिका वंचित घेत आहे. त्याच जुन्या प्रयोगाची सुपारी पुन्हा वंचितला मिळाली आहे. पण 2019 इतके ते सोपे नाही. देशातील जनता भाजपला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना साथ देणार नाही. हे आता प्रकाश आंबेडकर अन् त्यांच्या सारख्या अनेक नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
2014 चे सत्तांतर एक षढयंत्र असले तरी देशातील जनतेला हा स्वाभाविक बदल वाटत होता. पण अगदी पाच वर्षाच्या आतच जनतेला याबद्दलचा विट येईल, असे काम मोदीने केले. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत भाजपला विजय मिळणे कठीण होते. त्याच कठीणला सुलभ करण्यासाठी मोदीने अनेक युक्त्या काढल्या. त्यामध्ये पुलवामासारखी घटना अन् देशात बी टीम उभा करण्याचा निर्णय याचा समावेश आहे. भाजपला न मिळणारी मतं विरोधकांकडे जाऊ द्यायची नाहीत, अशी कामगिरी या बी टीमवर. तो महाराष्ट्रात वंचित, एम्आयएम युतीच्या रुपात उभा राहिला. प्लॅननुसारच सर्व घडले. राज्यात आमचा मुकाबला फक्त वंचित व एमआयएमशी आहे. असे त्यावेळी भाजप नेते जाहीर सभातून बोलत होते. याचा अर्थ असा की, आपल्या खऱ्या विरोधकांना स्पेसच मिळू द्यायचा नाही. जो लोकशाही व्यवस्थेत अतिशय महत्त्वाचा व लोकशाहीला सशक्त बनवितो. भाजपचा यात डब्बल फायदा झाला. लोकशाही व्यवस्था कमजोर झाली, जो संघाच्या अजेंड्याचा महत्त्वाचा भाग आहे. अन् सेक्युलर मतांमध्ये विभाजन होऊन भाजपचा फायदा झाला.
2019 च्या अगोदरचे प्रकाश आंबेडकर व त्यानंतरचे प्रकाश आंबेडकर यामध्ये जमीन आसमान असा फरक आहे. त्यांनी महाराष्ट्रात अनेक पंचवार्षिक प्रयोग केले. हे खरे पण त्याच्या काही मर्यादा होत्या. म्हणजे अकोल्याच्या बाहेर पडायला ते तयार नसायचे. पण 2019 च्या निवडणुकीचे बिगुल वाजण्या आधीच ते महाराष्ट्रभर सक्रिय झाले. अन् 1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगाव दंगल झाली. अन् याच दंगलीमुळे प्रकाश आंबेडकर यांच्या राज्यव्यापी नेतृत्वाचा उदय झाला. पुढे वंचितची स्थापना झाली. निवडणुकीची साधने आली. भिडेचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीत संघाचा चेहरा गोपीचंद त्यांना येवून मिळाला अन् वंचितची घोडदौड सुरू झाली. ठरल्या प्रमाणे सर्व होत गेले.नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार मिळत नसलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्याकडे उमेदवारीसाठी रांगा लागल्या. कुठलाही संघर्ष अथवा आंदोलन न करता, कुठे ही शाखा नसताना वंचित राज्यातील एक प्रमुख पक्ष बनला. यावेळी गोदी मिडिया सोबत होता. हे मुद्दाम सांगितले पाहिजे.
2019 च्या निवडणुका संपताच राजकीय विश्लेषने बाहेर आली. भाजपच्या बी टीम राजकारणावर शिककामोर्तब झाला. त्यामुळे तोच प्रयोग पुन्हा, पण नव्या दमाने करण्याची तयारी सुरु झाली. विरोधकांशी युती करून त्यांची महा विकास आघाडी तोडायची. वंचितने शिवसेनेला युतीची ऑफर देवून तसा प्रयत्न केला. शिवसेना नेते याबाबत सावध होते. त्यांनी खेळवत ठेवले जे जरुरी होते. येथे भाजपचा गेम फेल झाला. देशभर आज बी टीमचे जाळे पसरले असून या टीम दलित, ओबीसी या जागृत बहुजन समाजातील नेत्यांच्या नेतृत्वात उभ्या आहेत. हे पक्ष व नेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले नेते मानतात. अन् बहुजन वर्गाच्या भावनांशी खेळत त्यांना सेक्युलर फोर्सच्या विरोधात उभा करतात. अन् यामध्येच भाजपचा लाभ होत आहे.
महाराष्ट्रात भाजपचा सुपडासाफ होणार ? असा एका सर्व्हेचा रिपोर्ट असून हा सर्व्हे भाजपनेच केलेला होता. भाजपला ४८ पैकी १० चा आकडा ही पार करता येणार नाही, असा हा सर्व्हे सांगतो. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलविण्यासाठी भाजपने तिरंगी लढती होतील, असे वातावरण तयार केले. इंडिया, एनडीए अन् वंचित ( वंचित – ओबीसी आघाडी) अशा तिरंगी लढती राज्यात होतील अन् भाजपला जिंकून देण्या इतकी मतं वंचित व तिच्या सोबत असलेल्या ओबीसी आघाडीला मिळाली पाहिजेत, असा प्रयत्न भाजप करीत असून या प्रयत्नाचा पहिला भाग मुस्लिम आहे. उभा राहणाऱ्या तिसऱ्या आघाडीला मुस्लिम समाजाचा पुळका येईल व ते मुसलमानांना भरभरून तिकीटे अन् निवडणूक निधी देतील. दलित व ओबीसी समाजाला ही अशाच पद्धतीने टार्गेट केले जाईल. सत्तेतील भागीदारी या गोंडस नावाखाली हे सर्व होईल. ऐकायला छान वाटेल. पण दलित, मुस्लिम व ओबीसी मतांचे ठेकेदार बनलेले नेते ही भागीदारीची गोष्ट करून त्यांच्या मतांचा सौदा करीत आहेत. भाजपला मदत करण्यासाठी. हे राजकारण दलित, मुस्लिम व ओबीसी समाजाने समजून घेतले पाहिजे.

-राहुल गायकवाड
(महासचिव, समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने “नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन” या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभर स्मार्ट मीटर्स अथवा…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची राजावाडी हॉस्पिटलला भेट, जखमींची केली विचारपूस. मुंबई, दि. १४ मे २०२४घाटकोपरमध्ये एक…
वंचित-बहुजनांच्या राजकीय सत्तेचे काय !

वंचित-बहुजनांच्या राजकीय सत्तेचे काय !

“राजकारण हा काही आट्यापाट्याचा खेळ नाही. तो आमच्यासाठी संग्राम आहे, तो आमच्या जीवन मरण्याचा प्रश्न आहे”…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *