• 51
  • 1 minute read

भारतीयांच्या विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले

भारतीयांच्या विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले

विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचे पूजन करतो, परंतु सरस्वतीने आपल्या देशात बालवाडी, शाळा, महाविद्यालय सुरू केले का?. कोणाला अध्यापन केल्याची नोंद आहे का?. तसा कोणताही पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा नाही. सनातनी परंपरेने स्त्री शिक्षणावरती बंदी घातली होती, त्यामुळे ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार नव्हता.

सरस्वती एक महिला म्हणून तिच्याबद्दल नितांत आदर आहे, परंतु सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया आपल्या देशात प्रथमतः फुले दांपत्याने घातला. सावित्रीबाई फुले या भारतातील आद्य स्त्री शिक्षिका आहेत. त्यांनी सर्व जातीधर्मातील मुलामुलींना मोफत शिक्षण दिले. त्यांनी ब्राह्मण मुलींना देखील आनंदाने शिकवले. सावित्रीबाई फुले यांच्या काळात जर सरस्वती जन्माला आली असती तर सावित्रीबाईंनी सरस्वतीलासुद्धा शिकविले असते, इतक्या मोठ्या मनाच्या सावित्रीबाई होत्या.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे नेवसे पाटलांच्या कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्या जिज्ञासू होत्या. 1840 साली त्यांचा विवाह जोतीराव फुले यांच्याबरोबर झाला. जोतीराव फुले यांनी तत्कालीन अनिष्ट प्रथा नाकारून सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. फुलेंनी परिवर्तनाची सुरुवात स्वतःच्या कुटूंबापासून केली. या कार्याला जोतीरावांच्या वडिलांचा विरोध होता. जोतीराव फुले यांनी घर सोडले पण शिक्षण देण्याचे कार्य सोडले नाही.

फुलेंनी पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी सुरू केली. ही देशातील पहिली सार्वजनिक आणि मोफत शाळा आहे. त्या शाळेच्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून फातिमा शेख यांनी अध्यापनाचे काम केले.

ज्ञानाचे महत्त्व सांगताना सावित्रीबाई फुले लिहितात
“ज्ञान नाही, विद्या नाही।
ती घेणेची गोडी नाही।
बुद्धी असून चालत नाही।
तयास मानव म्हणावे का?।”
मानव हा बुद्धी ग्रहण करण्यास लायक आहे, त्यामुळे त्याने ज्ञानार्जन केले पाहिजे, मानव जर ज्ञानार्जन करत नसेल तर त्याला मानव तरी का म्हणायचे? असा प्रश्न सावित्रीबाई फुले विचारतात.

सावित्रीबाई फुले यांनी मराठी भाषेचा कैवार घेतला. मराठीचा अभिमान बाळगला, परंतु इंग्रजी भाषेचा त्यांनी कधीही तिरस्कार केला नाही, याउलट इंग्रजी भाषेचे महत्व सांगणारी कविता त्यांनी लिहिली. त्या लिहितात
“इंग्रजी माऊली । इंग्रजी वैखरी ।
शूद्रांना उद्धारी । मनोभावे ।”
इंग्रजी भाषेत शिक्षण घेतले तर तुमच्या पिढ्यानपिढ्याचे कल्याण होईल, असे सावित्रीबाई फुले यांचे मत होते.ते मत आज खरं ठरले आहेत.इंग्रजी भाषा शिकल्यामुळे अनेक लोक डॉक्टर, बॅरिस्टर, इंजिनिअर, वकील झालेले आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईना शिकविले. त्या देशातील पहिल्या शिक्षिका आहेत. त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढल्या. त्यांनी सर्व जाती धर्मातील मुला-मुलींना मोफत शिकविले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. बालविवाहाला प्रतिबंध केला.

सावित्रीबाई फुले यांनी केशवपन पद्धतीला विरोध केला. या अमानुष प्रथेविरुद्ध त्या लढल्या. सत्यशोधकांनी विधवा बालिकांचा आक्रोश कवितेतून पुढीलप्रमाणे व्यक्त केला आहे.
*”काहो आण्णा, मी तुमची लाडकी ।
का करिता मला बोडकी ।।”*

सावित्रीबाई फुले या अत्यंत संवेदनशील, कारुण्यमय मनाच्या होत्या. त्यामुळे त्या अन्यायाविरुद्ध लढल्या

सावित्रीबाई फुले या प्रागतिक विचारांच्या होत्या. त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, नवस सायास इत्यादी अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केला. त्या म्हणतात.
“धोंडे मुले देती,नवसा पावती
लग्न का करती नारी नर?”

नवसाने मुलं होत असतील तर मग लग्नाचीच गरज काय? असा सवाल सावित्रीबाई विचारतात. सनातनी व्यवस्थेला प्रश्न विचारायची हिम्मत त्यांच्याकडे होती. ही हिम्मत त्यांच्याकडे आधुनिक शिक्षणाने आलेली होती.

सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना करून निराधार महिलांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना मदत केली. गुंडांना पायबंद घातला. समाजातील. कर्मठ, सनातनी लोकांना त्या घाबरल्या नाहीत. धर्मांध लोकांना त्यांनी निर्भीडपणे प्रतिकार केला.

सावित्रीबाई फुले आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. माहेरी गेल्यानंतर जोतिरावांना पाठवलेल्या पत्रात त्या म्हणतात “कांही वैरी विदूषक आपल्याला ठार मारण्यास टपलेले आहेत,पण त्यांच्या भीतीने आपण हे शैक्षणिक, समाज परिवर्तनाचे काम अर्ध्यावर सोडायचे नाही”. सावित्रीबाई फुले यांच्या या भूमिकेतून त्यांचा निर्भीडपणा, हिम्मत आणि लढाऊ बाणा प्रकर्षाने दिसतो. त्यांनी महात्मा फुले यांना संकटसमयी प्रोत्साहन दिले, त्यांना नाउमेद केले नाही. स्त्री असल्याचा त्यांनी कधीही न्यूनगंड बाळगला नाही.

सावित्रीबाई माहेरी असताना त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्थाना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. माहेरी जाऊन त्या सुखात राहिल्या नाहीत, तर तेथे देखील त्यांनी प्रबोधन कार्य चालूच ठेवले.

महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले.पती निधनानंतर सती न जाता त्यांनी निर्भीडपणे सत्यशोधक चळवळीचे काम पुढे नेले. दत्तक पुत्र यशवंताला उच्च शिक्षण देऊन डॉक्टर केले.

सकाळी उठल्याबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करावे. त्यांचे दर्शन घेऊनच आपल्या दिवसाला सुरुवात करावी, असे सावित्रीबाई फुले एका काव्यातून सांगतात
“छत्रपती शिवाजीचे । प्रातःस्मरण करावे।
शूद्रादि अतिशूद्रांचा । प्रभू वंदू मनोभावे।”

महाराणी ताराराणी यांच्या कार्यकर्तृत्वाचा सावित्रीबाई फुले यांना मोठा अभिमान वाटत असे ताराराणीच्या कार्याची आणि शौर्याचे यथार्थ प्रदीर्घ वर्णन सावित्रीबाई फुले यांनी एका काव्यातून केले आहे.
” ताराबाई माझी मर्दिनी।
भासे चंडिका रणांगणी।
रणदेवी ती श्रद्धास्थानी।
नमन माझिये तिचिया चरणी।”

सावित्रीबाई फुले यांच्या जीवनात अनेक संकटे आली, पण त्या संकटात डगमगल्या नाहीत, निराश झाल्या नाहीत. संकटाला संधी समजून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. सावित्रीबाई फुले लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य आपल्याला हे सांगते की मुलगीसुद्धा वंशाला दिवा असते

सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा एक अस्सल फोटो उपलब्ध आहे. .यामध्ये सावित्रीबाई जोतीरावांच्या उजव्या बाजूला उभ्या आहेत. म्हणजे स्त्री ही दुय्यम दर्जाची नसून ती देखील हिम्मतवान,बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असते, हे जोतीराव फुलेंच्या नेणिवेतदेखील होते.

सावित्रीबाई यांनी ते स्वकर्तृत्वाने दाखवून दिले, त्या भारतातील पहिल्या शिक्षिका आहेत. त्या केवळ पारंपारिक शिक्षिका नव्हत्या, तर त्या गुलामगिरी, अनिष्ट प्रथा, सनातनी गुंड, विषमता यांच्याविरोधात लढणाऱ्या लेखिका, कवयित्री आणि प्रबोधनकार होत्या. त्यांचा आज स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

– डॉ.श्रीमंत कोकाटे

0Shares

Related post

अखिलेश व तेजस्वीने मोदीलाच सत्तेच्या राजकारणातील पर्याय म्हणून बाद केले…!

अखिलेश व तेजस्वीने मोदीलाच सत्तेच्या राजकारणातील पर्याय म्हणून बाद केले…!

भाजपसाठी योग्य नारा : 400 पार नाहीतर 40 च्या आत या देशाची लोकशाही व संविधानाला आम्ही…
एका मतामुळे वाजपेयींचे सरकार पडते तर १२ प्लस मतांची किंमत…?

एका मतामुळे वाजपेयींचे सरकार पडते तर १२ प्लस मतांची किंमत…?

अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकार अल्पमतात आले व विरोधकांनी सरकारच्या…
भाजपच्या मुस्लिम विरोधी राजकारणाचा प्रभाव इंडिया आघाडीवर ही असल्याने मुस्लिम समाजाला ग्रहीत धरून डावलले…!

भाजपच्या मुस्लिम विरोधी राजकारणाचा प्रभाव इंडिया आघाडीवर ही असल्याने मुस्लिम समाजाला ग्रहीत धरून डावलले…!

भारतीय संसदीय राजकारणात सर्वाँना हिस्सेदारी/ भागीदारी मिळाली पाहिजे याच भूमिकेतून अनुसूचित जाती, जमातींना राजकीय आरक्षण संविधानाच्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *