- 8
- 1 minute read
हत्याराविना कोट्यावधींच्या मनांवर राज्य करणारे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हत्याराविना कोट्यावधींच्या मनांवर राज्य करणारे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जगाच्या इतिहासात सत्ता, साम्राज्य आणि ‘राजा’ या संकल्पना बहुधा तलवार, रक्तपात आणि जिंकलेल्या भूभागाशी जोडल्या गेल्या आहेत. अलेक्झांडर, चंगेज खान, नेपोलियन या साऱ्यांनी आपापल्या सामर्थ्याने जग जिंकण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्या विजयामागे तलवारीचा धाक आणि हिंसेची सावली होती. मात्र या सर्वांच्या पलीकडे एक असा ‘राजा’ जन्माला आला, ज्याने ना कोणती तलवार उचलली, ना कोणावर आक्रमण केले; तरीही कोट्यावधी लोकांच्या मनांवर अधिराज्य गाजवले, तो म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
बाबासाहेब ‘राजा’ होते, पण सिंहासनावर नव्हे; ते होते विचारांच्या सिंहासनावर. त्यांनी सत्ता गाजवली, पण राज्यकर्त्यांसारखी नव्हे, तर समाजमनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विचारवंतासारखी. त्यांनी जिंकले पण युद्धभूमीवर नव्हे, तर अन्यायाविरुद्धच्या संघर्षात, ज्ञानाच्या शक्तीने आणि तर्काच्या धारदार अस्त्राने. डॉ. आंबेडकरांचा जन्म समाजाच्या सर्वात तळागाळातील, अस्पृश्यतेच्या अमानुष बेड्यांत अडकलेल्या कुटुंबात झाला. ज्या समाजाने माणसाला माणूस म्हणून मान दिला नाही, त्या समाजात जन्म घेऊनही त्यांनी जगाला मानवतेचा खरा अर्थ शिकवला. त्यांच्या आयुष्याची सुरुवात अपमान, तिरस्कार आणि बहिष्काराने झाली. शाळेत पाणी पिण्याचा हक्क नव्हता, वर्गात बसण्याची जागा नव्हती, समाजात मान-सन्मान नव्हता. पण या साऱ्यांनी त्यांचा आत्मविश्वास खचवला नाही; उलट त्या अन्यायानेच त्यांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटवली. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा मंत्र घोषवाक्य नव्हता, तर जीवनाचा पाया होता.
शिक्षणाला त्यांनी केवळ वैयक्तिक उन्नतीचे साधन मानले नाही, तर ते सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी अस्त्र बनवले. कोलंबिया विद्यापीठापासून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपर्यंत त्यांनी ज्ञानाची शिखरे गाठली; पण त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी स्वतःसाठी नव्हे, तर वंचित, शोषित आणि पीडित समाजासाठी केला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान केवळ कायदे लिहिण्यापुरते मर्यादित नाही. त्यांनी भारताच्या भवितव्याची दिशा ठरवली. समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांना त्यांनी राज्यघटनेतून मूर्त रूप दिले. प्रत्येक भारतीयाला ‘मानव’ म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी दिला, हीच त्यांची खरी सत्ता. आज आपण ज्या लोकशाहीत जगतो, तिची भक्कम पायाभरणी बाबासाहेबांनी केली आहे. मतदानाचा अधिकार, समानतेचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्व त्यांच्या विचारांचेच फलित आहे. ही सत्ता तलवारीने मिळवलेली नाही; ती मिळवलेली आहे संघर्ष, अभ्यास आणि तत्त्वनिष्ठतेच्या बळावर.
बाबासाहेबांचे कार्य केवळ राज्यघटनेपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी सामाजिक क्रांतीची बीजे पेरली. अस्पृश्यता, जातिभेद आणि अंधश्रद्धांविरुद्ध त्यांनी निर्भीडपणे लढा दिला. “जातिव्यवस्था ही मानवतेवरचा कलंक आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी परंपरांना प्रश्न विचारले, धर्मालाही आव्हान दिले आणि समाजाला नव्या विचारांकडे वळवले. महाडचा चवदार तळ सत्याग्रह असो किंवा काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन, प्रत्येक संघर्षात त्यांनी न्यायासाठी आवाज उठवला. त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही; पण त्यांच्या विचारांची धार इतकी तीक्ष्ण होती की अन्यायाच्या भिंतीच हादरल्या. त्यांची क्रांती शांत होती पण परिणामकारक होती. ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’ सारख्या लेखनातून त्यांनी समाजातील विषमता उघड केली. त्यांचे विचार एका समाजापुरते मर्यादित नव्हते तर ते संपूर्ण मानवजातीसाठी होते.
आजच्या काळात बाबासाहेबांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. प्रगतीच्या युगातही विषमता आणि अन्याय कायम आहे. अशा वेळी त्यांचे विचारच आपल्याला दिशा देतात. ते सांगतात खरा विकास आर्थिकच नव्हे, तर सामाजिक आणि मानसिकही असतो. दुर्दैवाने, आज बाबासाहेबांना अनेकदा पुतळ्यांपुरते मर्यादित केले जाते. जयंतीला मिरवणुका निघतात, कार्यक्रम होतात पण त्यांच्या विचारांचे आचरण कितपत होते, हा प्रश्न कायम आहे. त्यांचे खरे स्मरण म्हणजे त्यांच्या विचारांचे अनुसरण. त्यांनी दिलेली सर्वात मोठी शिकवण म्हणजे स्वाभिमान. “जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी समजता, तोपर्यंत कोणीही तुम्हाला उचलू शकत नाही,” हा त्यांचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. त्यांनी समाजाला आत्मभान दिले, स्वत्वाची जाणीव करून दिली आणि संघर्षाची ताकद दिली.
आज बाबासाहेब केवळ एका समाजाचे नेते नाहीत; ते संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी लोकांच्या मनांवर जे राज्य केले आहे, ते कोणत्याही राजाच्या सत्तेपेक्षा मोठे आहे कारण ती सत्ता प्रेमाची, विश्वासाची आणि न्यायाची आहे. जगातील अनेक राजे विस्मरणात गेले पण बाबासाहेबांचे विचार आजही जिवंत आहेत प्रत्येक त्या मनात, जे अन्यायाविरुद्ध उभे राहते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त, केवळ अभिवादन करून चालणार नाही. त्यांच्या विचारांना कृतीत उतरवणे, हीच खरी आदरांजली ठरेल. ज्ञान, समता, न्याय आणि बंधुतेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 136 व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!