महापुरुषांच्या विचारांचा वारसा समाजाला मिळतो. “शेतकऱ्यांनी लेकरासारखी जतन केलेली झाडे आरमारासाठी तोडताना मोबदला देऊन परवानगीने घ्या. स्त्रिया-लहान मुलांवर अन्याय करणाराची गय केली जाणार नाही. धर्माभिमान बाळगा; पण धर्मांधता खपवून घेतली जाणार नाही. जाती-पातीचा भेद खपवून घेतला जाणार नाही. जुलूम-जबरदस्ती खपवून घेतली जाणार नाही.” याची कृतीतून साक्ष देणारे आपले पूर्वज, स्वराज्य या विचाराने अवघे रान पेरणारे छत्रपती शिवराय…
तेच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे पहिले राजे.
दुपारी वरणभात खाऊन वामकुक्षी घेणाऱ्यांपेक्षा दिवसभर शेतात राबून नंतर येठण खुंटीला ठेवलं की स्वराज्यासाठी तलवार हाती धरणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, महिला-पुरुषांसह वंचितांचा शिवरायांवर पहिला हक्क आहे आणि त्याच वारशाला जागत शिवविचारांची मशाल घेऊन आम्ही तेरा शेतकरी मावळे नाटकाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहोत. आपल्या राजाचं मोठेपण, थोरवी, प्रजेप्रति ममत्वभाव सांगण्यासाठी, आपल्या या थोर पूर्वजांच्या देदीप्यमान इतिहासातील विचारांनी आपल्या आयुष्याची वाट उजळून टाकण्यासाठी. कारण आपल्या वाटा काजवे नाही, सूर्यच उजळू शकतो. काजव्याच्या उजेडाने कधी वाट दिसत नसते. ती त्याच्यापुरतीच असते. काजवा फक्त त्या उजेडाचा स्वतःचे अन्न शोधायला वापर करतो. तो त्या उजेडाने कधी दुसऱ्याला वाट दाखवू शकत नाही. म्हणून आपण आपल्या पूर्वजांच्या देदीप्यमान सूर्यतेजात आपली वाट उजळून घेऊया.
आपल्या क्षितिजावर शिवराय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंसारखे सूर्य आहेत. आपण विचारांच्या परंपरेतून आलोय याचं भान आणि जाण करून देण्यासाठी… काजवा नाही तर सूर्यच आपल्या वाटा उजळू शकतो… म्हणून आम्ही आपल्या माणसांसाठी, आपल्या महामानवांचे विचार घेऊन येत आहोत. त्यांच्या विचारातली समता, बंधुता आणि स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य समजून घेण्यासाठी… आम्ही पुन्हा आलोय… ते केवळ आपल्या पाठिंब्यावर, आपली विचारांची नाती घट्ट करण्यासाठी… तेरा वर्षांपूर्वी तुम्ही अक्षरशः डोक्यावर घेतलं ते नाटक यातील महामानव डाॅ. बाबासाहेब आणि शिवरायांमुळे. अगदी पारगावच्या पारापासून ते दिल्लीच्या श्रीराम सेंटरपर्यंत या नाटकाचा डंका वाजला… आपल्या रिअल हिरोंच्या विचारांमुळेच… पण शिवरायांचे विचार हे एका पिढीसाठी नाही तर पिढ्यानपिढ्यांसाठी संजीवनी, चैतन्य आहेत. म्हणून हे नाटक आलं तेव्हा पाच-पाच वर्षांची मुलं आता अठरा वर्षांचे सज्ञान नागरिक झालेले आहेत. तुमच्या मदतीने आपल्याला शिवरायांचा आणि डाॅ. बाबासाहेबांचा समतेचा विचार वारसा त्यांच्यापर्यंत पोहचवायचा आहे.
गेली तेरा वर्षे व्यावसायिक नाही; पण सामाजिक रंगभूमीवर तुम्ही जगवलेलं“शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला”हे नाटक छत्रपती शिवराय व डाॅ. बाबासाहेबांना मानाचा मुजरा करून… हे मावळे शिवविचार पेरण्यासाठी पुन्हा सज्ज झालेत. तुमच्या साथीने…
जय भीम, जय शिवराय…!

