- 10
- 1 minute read
कोणीतरी हे सांगायची गरज होती. काल राहूल गांधींनी ते रोखठोक सांगून टाकलं.
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 18
कोणीतरी हे सांगायची गरज होती. काल राहूल गांधींनी ते रोखठोक सांगून टाकलं.
तुम्ही म्हणजे देश नाही. तुम्ही म्हणजे भारताचं सैन्यदल नाही हे राहूल गांधी रोखठोक बोलले हे बरंच झालं. एक फक्त राहिलं. तुम्ही म्हणजे हिंदू धर्म नाही हे एक सांगायला पाहिजे होतं.
2014 पासून देश आणि धर्म पळवायचे प्रयत्न चालू आहेत. जणू हा देश म्हणजे यांच्या पप्पाच्या खाजगी इस्टेटीतला प्लाॅट आहे आणि धर्म म्हणजे यांच्या आजोबानं अश्वमेध यज्ञाचा जिंकून आणलेला घोडा आहे अशा मिजाशीत यांच्या सर्वोच्च ते गल्लीतल्या टिनपाटापर्यंत आणि चिमुकल्या भक्तुल्यांपर्यंत सगळे वागत आहेत. देशाचा सातबारा जणू यांच्या नावावर केला लोकांनी असं यांना सिरियसली वाटतंय. इतका माज दाखवलेला सत्ताधारी पक्ष भारताच्या इतिहासात कधीही झाला नाही.
देशाचा आणि यांचा संबंध फक्त द्वेष पसरवून दिल्लीपासून ग्रामपंचायतीपर्यंत बेईमानीनं सत्ता हस्तगत करण्यापुरता. स्वातंत्र्ययुद्धाशी कोणताही संबंध नाही. असलाच तर माफीनामे लिहून देऊन I will always remain your obidient’ म्हणण्यापुरता बादरायण संबंध. टिळकांना यांनी आधी घेरलं. गांधीयुगात आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात आलं आणि पाच वर्षात यांनी वेगळा संघ काढला. तिथून पुढे देशासाठी काहीच केलं नाही. हिंदू संघटनाच्या नावाखाली मूठभर हिंदूंचा बहुसंख्यांक हिंदूवर ताबा ठेवणं, मुस्लीम आणि ख्रिश्चन द्वेष, काँग्रेसचा द्वेष, राष्ट्रपित्याचा द्वेष, राष्ट्रध्वजाचा द्वेष, राष्ट्रगीताचा द्वेष, हिंदू कोड बील सारख्या सुधारणांचा द्वेष हेच यांचे मुख्य उपद्व्याप.
2014 साली सत्ता काय आली सगळाच सातबारा आपल्या नावावर आला असा यांचा समज झाला. ‘हिंदू धर्मात तीन रंग अशुभ’ म्हणून आम्ही कदापि तिरंगा हा राष्ट्रध्वज मानणार नाही असं पुस्तकात लिहून ठेवणाऱ्या गोळवलकरांचे वैचारिक वंशज ‘घर घर तिरंगा’ च्या आरोळ्या द्यायला लागले. ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत न गाता वंदे मातरम हेच राष्ट्रगीत असं सत्तर वर्ष म्हणणारे अचानक एखाद्या थिएटरात एखादा असहाय्य जन गण मनच्या वेळी उभा राहिला नाही तर त्याला मारहाण करायला लागले. इतकंच काय हिंदुस्तानची क्रिकेटची टीम सुद्धा यांची खाजगी जायदाद झाली. भारत जिंकला की रस्त्यावर उन्माद करण्याचे हक्कच यांना जणू काही भारतानं लिहून दिले अशी अवस्था झाली.
जी गत देशाची तीच गत सैन्यदलांची. यांचा सैन्यदलावर विश्वास होता तर आरएसेसच्या रेजिमेंटेशनची गरज संपायला हवी होती. कशाला तुम्ही दसऱ्याला सशस्त्र संचलन करता? पॅरलल मिलिट्री तयार आहे आमची हे दाखवायला? आम्ही आमच्या सैन्यदलावर विश्वास ठेऊन शांत बसतो, तुम्हाला तुमची मिलिट्री का तयार करायची आहे? भारताच्या सैन्यदलावर विश्वास नाही का? श्रीश्री रविशंकर नावाचा बुवा स्वतःच्या कार्यक्रमात पूल बांधून घेण्यासाठी भारतीय सैन्यदलाचा गैरवापर करतो याची यांना कधी लाज वाटली नाही. पुलवामात यांनी विमानं न देऊन आपले सैनिक मारले असं यांच्या पक्षाच्या राज्यपालांनी देशाला सांगितलं. त्याची यांना लाज वाटत नाही. सैन्यदलाच्या पगाराचे प्रश्न असोत की पेन्शनचे, त्यात यांना काही करावं वाटलं नाही पण सैन्यदलाचा सातबारा मात्र आपल्या नावावर करण्यासाठी हे तत्पर.
तेच धर्माचं. मूळ हिंदूधर्माचा आणि यांचा संबंध काय? सर्वसमावेशकता, दया, क्षमा, शांती, विश्वबंधुत्व यांचा यांच्याशी कोणताही संबंध नाही. वारकरी सांप्रदायाशी कोणताही संबंध नाही. बुद्ध, महावीर, कबीराशी संबंध नाही. बलात्कारी आणि नकली बाबाबुवांशी संबंध असणे म्हणजे हिंदू धर्माशी संबंध असणे नव्हे पण धर्माचा सातबाराही यांनी आपल्या नावावर करून घेतला.
आम्ही सांगतो तोच देश आणि आम्ही सांगतो तोच हिंदू धर्म इतका उर्मटपणा यांच्या अंगात भिनला आहे. काल राहूल गांधींनी आरसा दाखवला आणि तुम्ही म्हणजे देश आणि सैन्य नाही हे सांगून टाकलं ते बरं झालं.
देशाच्या सर्वोच्च सभागृहात यांना हे कोणीतरी ठणकावून सांगण्याची गरज होती. काल ते काम राहूल गांधींनी दोन वाक्यात केलं. ही वाक्य त्यांना सगळ्यात जास्त लागली असणार.
डॉ विश्वंभर चौधरी
0Shares