ऐंशीच्या दशकात उधळलेल्या गेल्या ४० वर्षातील नवउदारमतवादी आर्थिक तत्त्वज्ञानाचा घोड्याने आता फॅसिझमचा रस्ता पकडला आहे.
या घोड्याला अडवण्याची ताकद जर कोणत्या राजकीय शक्तीत होती (आणि अजूनही आहे) तर ती होती / अजूनही आहे, सजग राजकीय कामगार वर्गात आणि त्यांच्या कामगार संघटनात
हे सत्य बाकी कोणाला नाही तरी नवउदारमतवाद्यांना पक्के ठाऊक होते ; त्यामुळे त्यांनी पहिला घाला घातला तो सर्व प्रकारच्या कामगार संघटनावर ! कारण एकट्या कामगारापेक्षा , संघटित कामगाराची शक्ती काही पटींनी जास्त असते. परिणामी कामगार संघटनांची सभासद संख्या झपाट्याने कमी होत गेली.
ओईसीडी या औद्योगिक दृष्ट्या प्रगत ३५ राष्ट्रांच्या समूहात (अमेरिका , युरोप इत्यादी ) १९८५ सालात ३० % कामगार वर्ग कोणत्या ना कोणत्या ट्रेड युनियनचा सभासद होता ; ते प्रमाण आता १५ % वर आले आहे
भारतासारख्या देशात तर अर्थव्यवस्थेत ९० % कामगार / कष्टकरी अजूनही अनौपचारिक क्षेत्रात / कंत्राटावर काम करतात.
कामगार वर्गाला कमकुवत करण्यासाठी किती प्रकारची शस्त्रे / शास्त्रे पाजळवली नवउदारमतवादाने ?
“तुमच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही आमच्याकडे / व्यवस्थापनाकडे या , आम्ही त्या सोडवू , तुम्हला ट्रेड युनियन कार्यकर्ते / नेते मध्यस्त म्हणून कशाला हवेत “ असे ठसवले गेले. पुढे जाऊन जे कोणी संघटनेचे सभासद होतील / होऊ पाहतील त्यांना धाक/ धापटशा , नोकरीतून काढून टाकण्यापर्यंत शिक्षा करून इतरांवर कायमची दहशत बसवली गेली. (उदा ऍमेझॉन
, सॅमसंग इत्यादी)
मोठयाप्रमाणावर कामगार कंत्राटावर घेतले गेले ; नवनवीन प्रकारचे कंत्राटीकरण उदा गिग इकॉनॉमी संकल्पना तयार केल्या गेला
बेकारीचे प्रमाण कमी करण्याच्या आर्थिक थिअरीज / धोरणे वाऱ्यावर सोडून देण्यात आल्या आणि गेटबाहेर उभी राहिलेली “रिझर्व्ह आर्मी / बेकारांची फौज” गेटच्या आतील कामगारांवर दडपण आणण्यासाठी वापरली गेली.
संघटित विरुद्ध असंघटित , व्हाईट कॉलर विरुद्ध ब्ल्यू कॉलर , विकसित राष्ट्रातील विरुद्ध विकसनशील / गरीब राष्ट्रातील कामगार अशी बुद्धिभेदी मांडणी करून त्याचा प्रसार केला
कामगार कायद्यात विविध प्रकारचे बदल करून त्याचे दातच उपटून टाकण्यात आले ; उदा. भारतातील चार कामगार संहिता.
याशिवाय धर्म / जात / भाषा / प्रांत अशा कितीतरी तलवारी पाजळून त्यांच्या शास्त्रागारात तयार ठेवलेल्या असतात , ज्यातून कामगार एकजुटीत फूट पाडली जाते.
कामगार आत्मसम्मान, भावना, उरी स्वप्ने बाळगणारी हाडामांसाची माणसे आहेत, मानवीश्रम पुरवणारी मशीन्स नाहीत हे सतत मांडण्याची गरज आहे.
देशानुसार, काळानुसार…धर्म, जात, वंश, भाषा, प्रांत या व अशा आधारावर कामगार, कष्टकऱ्यांमध्ये फूट पाडून फॅसिझम फोफावत असतो. त्यावर देखील काम सुरू आहे.
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी कामगार वर्गीय भावना आणि एकजुटीची भावना या ज्योती तेवत ठेवायलाच हव्यात. कामगारांच्या जोडीला सर्वच ग्रामीण शहरी कष्टकऱ्यांबरोबर रेन बो अलायन्स झाला पाहिजे. हे काम सुरूच आहे. अशी कामे चिकाटीने करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांना लाल सलाम !
संजीव चांदोरकर