हे चित्र आहे लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील हंगरगा ( कु. ) या गावचे. उदगीर – नांदेड रस्त्यावरील तोंडार पाटी पासून पश्चिमेला आत गेलं की खा. अरविंद कांबळे यांनी स्थापन केलेला प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना लागतो (आता त्याचं नाव ‘विकास ‘ ठेवलंय. तो लातूरच्या देशमुखांच्या ताब्यात आहे.
तर त्या कारखान्याच्या मागे अगदी सात आठ किलोमीटर अंतरावर डोंगर उतरून खाली गेलं की हंगरगा ( कु.) नावाचं छोटेसं गाव लागतं. या गावाच्या अलीकडच्या डोंगरावर एक बुद्ध विहार असून, पलीकडच्या डोंगरावर पीराचं ठाणं आहे. या गावाच्या नावा पुढे ( कु. ) का लागलं ? तर त्या गावात कुत्रा चावल्यानंतर औषध मिळतं असं लोक म्हणतात. गावात एक माध्यमिक विद्यालय असून, गावात लोकसंख्येनुसार मराठा आणि मातंग हे दोन प्रमुख समाज आहेत. त्यानंतर बौद्ध, लमान, मुसलमान, चांभार, कुंभार, हटकर असे छोटे छोटे जात समूह आहेत.
या गावातील दि. २९ एप्रिल २०२६ चे हे चित्र अत्यंत बोलके आहे. या गावात मातंग समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी त्यांना समाज मंदिर नाही. या गावातील मातंग समाजातील डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक काही प्रमाणात का होईना नोकरदार घडले आहेत. पण सध्याची स्थिती अत्यंत भयावह आहे. शिक्षणाचे प्रमाण कमी झालेले आहे. गावातून पुढे गेलेले चारदोन नोकरदार मागे पहायला तयार नाहीत. त्यामुळे अनेक खुळचट जुन्या रुढी, प्रथा, परंपरा बिनबोभाटपणे सुरू आहेत.
लग्न लागण्यापूर्वी नवरदेव आणि त्याचे इतर साडू भाऊ यांना शेवंती चढविण्याचा रिवाज मातंग समाजामध्ये आहे. तसेच यावेळी दोन्हीकडच्या वऱ्हाडी मंडळीची गळाभेट केली जाते. प्रस्तुत चित्रामध्ये असाच वऱ्हाड्यांच्या गळाभेटीचा प्रसंग आहे. भर उन्हाचा पारा चढलेला आहे. वेळ दुपारी बाराची आहे. माणसाची सावली सुद्धा दिसू नये असं प्रचंड ऊन तापलेलं आहे. आणि अशात हंगरग्याच्या मांगवाड्यातील एक शेवंती मारुतीच्या पाराकडे निघालेली आहे. एरवी दिवसभर खुले असणारे मंदिर लग्नाच्या दिवशी मात्र कुलूप बंद आहे. मंदिर खुले ठेवायचे का बंद हा गावकऱ्यांचा हक्क आहे. प्रश्न येतो की मातंग जात समूहातील नवरदेवाने मंदिराकडे जावेच का..? ज्या मंदिराच्या बांधकामात तुमचा सहभाग नाही, ते मंदिर तुमचे कसे होऊ शकेल..?? त्यामुळे हंगरग्याच्या मारुती मंदिरासमोर भर उन्हात वऱ्हाडी मंडळीला तासनतास तापावे लागले. एक माणूस कुलूप लावून मंदिरासमोर बसला असून त्याच्यासमोर कित्येक वऱ्हाडी भर उन्हात गाठीभेटी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
लग्नाचे वऱ्हाड मारुतीच्या पाराला खेटल्याबद्दल अनेक ठिकाणी मातंग समाजातील नवरदेवाला आणि वऱ्हाडी मंडळीला बेदम मारहाणीच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. काही ठिकाणी मांगांचे मुडदेही पडलेले आहेत. त्यामुळे निदान इथून पुढे तरी मातंग जात समूहातील नवरदेवांनी मंदिराकडे न जाता लग्न मंडपातच शेवंतीचा आहेर स्वीकारावा किंवा जिथे समाज मंदिर असेल किंवा अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा असेल त्या पुतळ्यासमोरच शेवंती स्वीकारावी. जेणेकरून गावकऱ्यांशी नाहक होणारे संघर्ष टाळता येतील.
मारोती कसाब