मानसिक आधार या गोष्टी मजबूत करणे गरजेचे आहे. वृद्धांचे आयुष्य सन्मानाने आणि सुरक्षिततेने जगता आले पाहिजे.
खरं तर प्रत्येक माणसाचे आयुष्य एक पूर्ण वर्तुळ असते. आज जो तरुण आहे, तो उद्या वृद्ध होणार आहे. त्यामुळे आज आपण वृद्धांकडे कसे पाहतो, त्यावर उद्याच्या समाजाचे चित्र अवलंबून आहे. जर आपण आज आपल्या आई-वडिलांना सन्मान दिला, तर उद्या आपल्यालाही तोच सन्मान मिळेल. वृद्धाश्रमांची वाढ ही केवळ सामाजिक बदलाची खूण नाही; ती एक इशारा आहे, नात्यांची उब जपण्याचा. आपण आधुनिक होऊ, प्रगती करू; पण त्याचवेळी आपल्या संस्कृतीची मुळेही जपली पाहिजेत. कारण माणसाला खरे समाधान संपत्तीमध्ये नाही, तर नात्यांच्या उबेत मिळते. आई-वडिलांनी आयुष्यभर आपल्या मुलांसाठी स्वप्ने पाहिली, त्याग केला, संघर्ष केला. त्यांच्या वृद्धत्वात त्यांना फक्त एकच गोष्ट हवी असते आपुलकी. जर आपण ती देऊ शकलो, तर वृद्धाश्रमांची गरज कदाचित कमी होईल.
आज समाजाने स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे की, आपण प्रगतीच्या शर्यतीत धावताना आपल्या आई-वडिलांना मागे तर सोडत नाही ना? जर या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे शोधले, तर कदाचित आपल्या समाजाला नव्या दिशेचा मार्ग सापडेल. वृद्धांचा सन्मान हा केवळ संस्कृतीचा भाग नाही; तो माणुसकीचा पाया आहे. ज्या समाजात वृद्धांचा आदर केला जातो, तो समाज खऱ्या अर्थाने प्रगत मानला जातो. म्हणूनच आज गरज आहे ती नात्यांना पुन्हा जिवंत करण्याची, कुटुंबव्यवस्थेला बळ देण्याची आणि आई-वडिलांच्या प्रेमाचे ऋण कृतज्ञतेने फेडण्याची. कारण शेवटी सत्य एकच आहे, ज्या हातांनी आपल्याला चालायला शिकवले, त्या हातांना वृद्धत्वात आधार देणे आणि हेच खरे संस्कार आहेत.